‘एव्हीएच’ अखेर चंदगडमधून हद्दपार
By Admin | Updated: February 14, 2016 00:20 IST2016-02-14T00:20:23+5:302016-02-14T00:20:23+5:30
गेली तीन वर्षे चंदगड परिसरातील जनतेच्या जीवनमरणाचा प्रश्न बनलेला ‘एव्हीएच’ प्रकल्प चंदगडमधून हद्दपार होणार आहे. कंपनीने इप्सिलॉन कार्बन प्रा. लि. असे नाव बदलून प्रकल्प

‘एव्हीएच’ अखेर चंदगडमधून हद्दपार
बेल्लारी येथे प्रकल्प हलविणार : सेंट्रल एक्साईजकडे मागितली परवानगी
कोल्हापूर : गेली तीन वर्षे चंदगड परिसरातील जनतेच्या जीवनमरणाचा प्रश्न बनलेला ‘एव्हीएच’ प्रकल्प चंदगडमधून हद्दपार होणार आहे. कंपनीने इप्सिलॉन कार्बन प्रा. लि. असे नाव बदलून प्रकल्प मुशिनयक्कनहळ्ळी, सुलतानपूर रोड, सोंडूर, जिल्हा-बेल्लारी (कर्नाटक) येथे हलविण्यासाठी उपायुक्त, सेंट्रल एक्साईज यांच्याकडे परवानगी मागितल्याची माहिती राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ व आमदार संध्यादेवी कुपेकर यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.
या वेळी आमदार मुश्रीफ म्हणाले, चंदगड तालुक्यात तीन वर्षांपूर्वी विनाशकाली एव्हीएच प्रकल्प सुरू झाला. यामुळे साऱ्या तालुक्याचे आरोग्य धोक्यात आल्याने याविरोधात मोठे जनआंदोलन उभे राहिले. जनआंदोलन कृती समितीच्या वतीने रस्त्यापासून न्यायालयापर्यंत अनेक लढाया केल्या. त्यामुळेच गेले ११ महिने प्रकल्प बंद आहे.
दोन महिन्यांपासून प्रकल्पाने हळूहळू गाशा गुंडाळण्यास सुरुवात केली आहे. सुरुवातीला त्यांनी ‘एव्हीएच’चे नामकरण करीत इप्सिलॉन कार्बन प्रा. लि.च्या माध्यमातून प्रकल्प बेल्लारी येथे हलविण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी कंपनीने ११ जानेवारीला सेंट्रल एक्साईजकडे केली आहे. (प्रतिनिधी)
फटाक्यांच्या आतशबाजीत विजयोत्सव
शासकीय विश्रामगृहावर एव्हीएच हद्दपार झाल्याची माहिती आ.मुश्रीफ देत असतानाच चंदगडच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतशबाजी करीत विजयोत्सव साजरा केला. ‘घालविला रे घालविला, एव्हीएच घालविला’ अशा घोेषणा दिल्या.
‘नंदी’ची चौकशी लावणार
‘एव्हीएच’ने १८० कोटींचा अति प्रदूषणकारी अंतर्गत येणारा उद्योग परवाना घेतला नसताना प्रकल्प चालूच झाला कसा? याबाबत मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले.
चंदगडमधील लहान मुलांसह वयोवृद्धांनी आंदोलनात सहभाग घेतला. आपल्या आमदारकीच्या काळात हा प्रकल्प उभा राहिल्याने तो घालविणे हे माझे कर्तव्य होते. नंदाताई बाभूळकरांनी सातत्याने पाठपुरावा करीत न्यायालयीन लढाई दिली. आजच्या विजयावर राष्ट्रवादी कॉँग्रेस कधीच दावा करणार नाही. सर्वपक्षीय लोकांनी विशेषत: चंदगड, गडहिंग्लजची जनता पाठीशी राहिल्यानेच यश आले.
- संध्यादेवी कुपेकर,
आमदार, चंदगड विधानसभा