मुंबई - वारीच्या काळात भक्तांवर होणाऱ्या हल्ल्याची संतापजनक घटना समोर आली असून, पंढरपूर दर्शनासाठी निघालेल्या महिला भाविकांवर दौंड तालुक्यातील चिंचोली परिसरात हल्ला झाला आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र विधानपरिषद उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेतली असून, कोल्हापूर परिक्षेत्रातील विशेष पोलीस महानिरीक्षकांकडे तातडीने सखोल चौकशी करून आरोपींना अटक करण्याची मागणी केली आहे.
३० जून रोजी पहाटे साडेचारच्या सुमारास पुणे-सोलापूर महामार्गावरून एक कारमधून काही भाविक श्री विठ्ठल दर्शनासाठी पंढरपूरकडे जात होते. चिंचोली येथे चहा पिण्यासाठी थांबले असताना दोन अज्ञात दुचाकीस्वार घटनास्थळी आले आणि त्यांनी एका महिला भाविकाच्या तोंडावर मिरचीपूड फेकून पलायन केले. या अचानक झालेल्या हल्ल्यामुळे भाविकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.
याबाबत नीलम गोऱ्हे यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे की, "वारी ही महाराष्ट्राची अध्यात्मिक आणि सामाजिक ओळख आहे. अशा पवित्र प्रवासात भाविकांवर हल्ला होणे अत्यंत दुर्दैवी असून, पोलिसांनी तातडीने कारवाई करावी." त्यांनी पुढील उपाययोजना सूचवल्या आहेत -- महामार्गांवरील पोलीस गस्त वाढविणे- भाविकांच्या मार्गावरील सुरक्षेची पुनर्रचना- विशेष नियंत्रण कक्ष स्थापन करणे- महिला भाविकांच्या सुरक्षेसाठी विशेष गस्ती गाड्या सुरू करणे
या घटनेच्या पार्श्वभूमीवर शासनाने भाविकांच्या सुरक्षेच्या बाबतीत अधिक दक्षता घेणे आवश्यक असल्याचेही नीलम गोऱ्हे यांनी स्पष्ट केले.