१९९७ मध्ये संपूर्ण भारतात दहशतवादी हल्ले करण्याची योजना आखल्याबद्दल आणि २००२ आणि २००३ मध्ये मुंबईत दोन बॉम्बस्फोट घडवून आणल्याबद्दल शिक्षा भोगून सुटलेल्या साकिब नाचणच्या गावात मोठी कारवाई करण्यात आली आहे. गुप्त माहितीनुसार या गावातील नाचणचे काही लोक दहशतवादी हल्ल्याचा कट रचत असल्याचे समजले होते. यानंतर सुमारे ३५० हून अधिक पोलीस आणि १०० हून अधिक एटीएसच्या अधिकाऱ्यांनी नाचणच्या गावावर छापा टाकला.
मुंबई नाशिक महामार्गावरील भिवंडी तालुक्यातील पडघा नजीकच्या बोरिवली या गावात हा छापा टाकण्यात आला. ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे ग्रामीण, रायगड ग्रामीण येथील तब्बल ३५० हून अधिक पोलिस कर्मचारी अधिकारी, शीघ्र कृती दलाच्या जवानांनी संपूर्ण गावाला वेढा दिला होता. मुंबई एटीएस पथकाचे सुमारे १०० अधिकारी कर्मचारी यांनी गावातील साकिब नाचण सह इतर अनेक घरात सर्च ऑपरेशन राबविले.
मुंबई एटीएस पथकासह ठाणे, नाशिक येथील पथकाने या कारवाईमध्ये सहभाग घेतला होता. पहाटे ३ वाजता सुरू झालेली कारवाई दुपारी १ वाजता पूर्ण झाली. या कारवाईमध्ये बोरिवली गावातील साकिब नाचणसह एकूण २२ घरांमध्ये सर्च ऑपरेशन करून तेथील संशयित व्यक्तींचे मोबाईल व लॅपटॉप तपासण्यात आले आहेत. या कारवाईवेळी अनेक मोबाईल व सिमकार्ड हे ताब्यात घेण्यात आले आहेत. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अजून एटीएस पथकाने कोणालाही अटक केलेली नाही.
साकिब नाचन हा सिमीचा सक्रिय सदस्य होता आणि २०१७ मध्ये सुटका झाल्यानंतर तो आयसिसमध्ये सामील झाला आहे. डिसेंबर २०२३ मध्ये बोरिवली गावात साकिब नाचनच्या घरावर आणि इतर चौदा आरोपींच्या परिसरात एनआयएने टाकलेल्या छाप्यांमध्ये मोठ्या प्रमाणात शस्त्रे आणि दारूगोळा, धारदार शस्त्रे आणि मोठ्या प्रमाणात रोख रक्कम जप्त करण्यात आली होती.