अंत:करणातील वीणेचा अखंड झणकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2018 04:38 AM2018-05-07T04:38:12+5:302018-05-07T04:38:12+5:30

ज्येष्ठ भावगीत गायक अरुण दाते यांच्या शतदा प्रेम करावे या आत्मचरित्राला महाराष्ट्र भूषण पु.ल. देशपांडे यांची प्रस्तावना लाभली होती. या प्रस्तावनेत पु.लं.नी अरुण दाते यांच्या संदर्भातील केलेले लिखाण किती सार्थ होते, हे प्रत्येक शब्दातून प्रतित होते. ही प्रस्तावनाच खास ‘लोकमत’च्या वाचकांसाठी देत आहोत.

Arun Date News | अंत:करणातील वीणेचा अखंड झणकार

अंत:करणातील वीणेचा अखंड झणकार

Next

- पु.ल. देशपांडे
‘शतदा प्रेम करावे’ ही अरुण दातेंनी एखाद्या खासगी मैफिलीत सहजपणाने चार गाणी म्हणावी, इतक्या सहजतेने आपल्या जीवनयात्रेची सांगितलेली कहाणी आहे. उर्दू भाषेत दास्ताँ म्हणतात, तशी ही कहाणी. त्या सांगण्याला कुठेही औपचारिकपणाचा स्पर्श नाही. मित्रमंडळींच्या सहवासात कसलेही दडपण येऊ न देता गाण्याचे उपजत देणे लाभलेल्या या गायकाने गाता गाता त्याच सहजतेने आपल्या आयुष्यातल्या मनात घर करून बसलेल्या आनंदाच्या क्षणांची माळ गुंफावी, तशा या आठवणी गुंफल्या आहेत. गाण्याच्या परिभाषेत सांगायचे, म्हणजे ही एक लयीशी खेळत चाललेली बोलबाट आहे. आयुष्यात भेटलेल्या माणसांच्या, घडलेल्या प्रसंगांच्या, आपल्या कुटुंबीयांच्या, मित्रांच्या, स्मरणचित्रांचा हा एक सुंदर पट आहे. जीवनाच्या ज्या ज्या क्षेत्रात तो रमला, अनुभवांचे वादी-संवादी आणि विसंवादी-त्याला जे दर्शन घडले, जिथे त्याला कलावंताची उपेक्षा म्हणजे काय, प्रचंड प्रमाणातली प्रशंसेची दाद म्हणजे काय, या साऱ्या गोष्टींची इथे स्नेहभावनेने नोंद करून ठेवली आहे. जीवनात कटू अनुभव येणे स्वाभाविक असते; पण स्मृतीची ही चित्रे रंगवताना त्या निर्मितीचा कुणाच्या डोळ्यांवर आघात होणार नाही, याची त्याने काळजी घेतली. मैफिलीत कुठे बदसूर उमटू दिला नाही. कथनाला कुठे कृत्रिमतेचा स्पर्श घडू दिला नाही. एक तर स्वरलोभी रसिकांच्या मैफिलीत कृत्रिमतेला वावच नसतो. गाणे जितके सहज, तितकीच त्या गाण्याला मिळणारी सहज-उत्स्फूर्त दाद. मनात वाटलेला आनंद व्यक्त कसा करावा, असल्या विचाराशी घुटमळायला असल्या मैफिलीत सवडच नसते. गाण्याचा आनंद ऐकणाºयाला दिला केव्हा, याची तो देणाºयालाही पूर्वकल्पना नसते; आणि सुरांचा तो मधुर वेदना देणारा तीर नेमका लक्ष्यवेध करून गेला केव्हा, याचा ती दुर्मीळ जखम झालेल्या रसिकालाही पत्ता नसतो. असली मोलाची दाद लाभल्याचे भाग्य कलेच्या क्षेत्रात जगलेल्या सगळ्यांच्याच वाट्याला येते असे नाही. गाणाºयाला तर असली दाद मिळवून देणारी सुरांची लड कशी स्फुरते, याचे रहस्यही उमगलेले नसते. ती दाद कुणी विचारपूर्वक दिलेली असते, असेही नाही. ती दिली गेल्याचे, दाद प्रकट झाल्यानंतर जाणवते. ते नर्गिसचं फूल, तो बागेत बड्या मुश्किलीनं पैदा झालेला नजरदार दीदावर, नेमकं त्या फुलावर त्याचं ते ज्ञात्याचं पाहणं हा सारा योग जुळून यावा लागतो. त्या क्षणाच्या अकल्पितपणाचं कोडंच आहे. आज आपलं गाणं नेहमीपेक्षा अधिक का जमलं, याचं नेमकं कारण गायकालाही उमजलेलं नसतं. दुसरी गोष्ट म्हणजे, अनेक वेळा गाताना एखाद्या जागेवर साºया मैफिलीतला प्रत्येक श्रोता दाद देण्याचं कुठलंही पूर्वनियोजन नसताना सामुदायिक दाद कशी देऊन जातो, तेही न सुटलेलं गूढ आहे. या सगळ्या कोड्यात आणखी एक भर म्हणजे केवळ उपचार म्हणून दिलेली दाद कोणती आणि उत्स्फूर्तपणानं गेलेली दाद कुठली, याची अनुभवी आणि रसिल्या तबियतीच्या गायकाला चांगली जाण असते, प्रतिसादाचा सच्चेपणा त्याला चांगला ओळखता येतो. अशी शंभर टक्के सच्चेपणानं दिलेली दाद चांगल्या कलावंतांना वर्षानुवर्षे लाभली. मैफिलीत ज्याची हजेरी म्हणजेच मैफिलीच्या यशाची आगाऊ पावती, अशी भावना ज्यांच्यामुळे कलावंतांना निर्माण होत आली, त्या रसिकाग्रणी रामूभय्या दात्यांचा अरुण हा मुलगा. त्यांनीच वाढीला लावलेल्या संगीत, नाटक, साहित्य, नृत्य, रंगरेषा यांसारख्या माणसाचं जीवन सार्थ करणाºया वातावरणात अरुण वाढला.
‘माझे जीवन गाणे’ हे केवळ एका गाणाºयानंच नव्हे, तर सगळ्या कुटुंबानं मंत्रजागरासारखं म्हणावं, असं हे इंदौरचं दात्यांचं खानदान. जीवनातला प्रत्येक क्षण सुरेल व्हावा, हा ध्यास घेऊन वाढणारी ही मंडळी केवळ कुटुंबीयांपुरतं हे सूर-लयीचं नातं जुळावं, एवढ्यापुरता हा ध्यास मर्यादित नव्हता. तो आसपासच्या चारचौघांत वाटून द्यावा, त्यांची जीवनं सुखी करावी, ही त्यांच्या मनाला ओढ होती. त्यासाठी आपलं घर स्वरोपासनेचं मंदिर व्हावं, सुरांचा हा दैवी प्रसाद त्यांनाही सुरांनी कान पवित्र करणारा व्हावा, ही या दाते कुटुंबीयांची मनोमन इच्छा होती. घरातल्या दिवाणखान्यातली मैफील संपली, तरी अंत:करणातली वीणा अखंड झणकारतच राहिलेली असायची. ‘सुंदरतेच्या सुमनावरचे दव चुंबुनी घ्यावे’ ही ज्या घरातल्या अबालवृद्धांची वृत्ती होती, असल्या कुटुंबात अरुण लहानाचा मोठा झाला. त्या मैफिलीतल्या चिमुकल्या श्रोत्याच्या भूमिकेत तो केव्हा शिरला आणि यशाची एक एक पायरी चढत आज भावगीत-गायनाच्या क्षेत्रात लोकप्रियतेचं शिखर त्यानं केव्हा गाठलं, ते त्यालाही कळलं नाही. तो गात राहिला. ऐकणाºयांची संख्या वाढत राहिली. मात्र हा सगळा प्रवास काही मऊ मऊ गालिच्यांवरून झाला नाही. वाटेत काटेही रुतले. कुठल्याशा आर्थिक उलाढालीत वडिलांना फार मोठी खोट आली. प्रसादतुल्य वाडा विकावा लागला; पण हा आर्थिक फटका सूर-लयीचा आणि त्यातून लाभणारा दैवी श्रीमंतीचा आनंद हिरावून घेऊ शकला नाही. तंबोºयातून उमटणारे षड्ज-पंचम कुणीही हिसकावून घेऊ शकले नाहीत. तीन खोल्यांच्या नव्या बिºहाडात स्वयंपाकघर मांडून होण्याआधी समोरच्या छोट्याशा खोलीत बिछायत पसरली गेली. तंबोरे सुरांचं गुंजन करायला लागले. तीन-साडेतीन खोल्यांचा तो ब्लॉक तिथं स्वरमहाल उभा राहिला. पूर्वापार चालत आलेल्या कलावंतांचा राबता तसाच चालू राहिला. त्या काळी राजे होळकर सरकार असले, तरी रामूभय्या दाते नावाचा हा रसिकाग्रणी इंदौरातल्या सुरांच्या दुनियेतला अनभिषिक्त बादशहा होता. राजवाड्यावर खास आमंत्रणामुळे आलेले गायक-गायिका, वादक-नर्तक वाड्यावर मुजºयाला जाण्याआधी रामूभय्यांच्या कुटिरात जाऊन त्यांचा आशीर्वाद घेऊन जायचे. रामूभय्यांसारख्या, जाणत्या रसिकाकडून लाभणारी दाद दरबारातून मिळणाºया बिदागीच्या दसपट मोठी त्यांना वाटायची.
आपल्या कुटुंबातल्या त्या स्वरमयी वातावणाचं या कहाणीत फार सुरेख वर्णन केलं आहे. ही कथा वाचताना प्रकर्षानं जाणवतं, ते म्हणजे अरुणच्या गाण्याप्रमाणं लिहिण्यातलं माधुर्य. माधुर्य हा तर अरुणच्या गाण्याचाच नव्हे, तर स्वभावाचा गुण आहे. या कथनात अरुणनं कुठंही चुकूनसुद्धा तक्रारीचा कठोर सूर उमटू दिला नाही. ‘या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे’ अशा वृत्तीतच तो रमला. ही स्थानं त्याला भावकवितेत सापडली. गझलेच्या दुनियेतून तो मराठी गीतांच्या प्रदेशात आला. येताना त्यानं गझलेच्या रचनेतली भाववृत्ती जोपासली. त्या वृत्तीतली ताकद हेरली. भावनाप्रधान आणि भावबंबाळ यातला फरक ध्यानात घेतला. रसिकांच्या मनात त्याच्या गीतांनी स्थान मिळविलं. गायक म्हणून त्याला उदंड यश मिळालं. म्हणून जगाला तुच्छ मानून कलावंताची मिजास मिरविण्याचा हव्यास बाळगला नाही. जुन्या आणि समकालीन कलावंतांच्या गुणांचं मन:पूर्वक कौतुक केलं.
अरुण हा उत्तम गीतगायक आहे. आपल्या गीतगायनाच्या यशात कवी, संगीत-दिग्दर्शक, गुरुजन त्यांचा वाटा तो फार महत्त्वाचा मानतो. यशाचं संपूर्ण धनीपण स्वत:कडं घेतलं नाही. आपल्याला चांगले कवी व त्यांच्या चांगल्या कविता मिळाल्या, त्यांना चाली लावणारे प्रतिभावान संगीत-दिग्दर्शक मिळाले, महावीरजींसारख्या या हृदयातून त्या हृदयात नेणारा असामान्य प्रतिभेचा गुरू मिळाला, हे त्यानं आपलं भाग्य मानलं. त्याच्या कहाणीतलं मोठेपण त्याच्या या विनम्र व कृतज्ञ भावनेत आहे. होतकरू कलावंतांचा उत्साह वाढवणारी अशी ही कथा आहे. अरुणची ही जीवनावरची मधुराभक्ती श्रोत्यांना आनंद देऊन गेलेली आहे. आजही जात नाही. भावी काळात लाभणाºया या पुस्तकाच्या वाचकांंचीही त्याला अशीच दाद मिळेल, याची मला खात्री आहे.

: साभार :
पुस्तक : शतदा प्रेम करावे
लेखक : अरुण दाते
प्रकाशक : मेहता पब्लिशिंग हाउस

Web Title: Arun Date News

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.