कृत्रिम पावसाच्या प्रयोगाची सांगता!
By Admin | Updated: October 20, 2015 00:23 IST2015-10-20T00:23:39+5:302015-10-20T00:23:39+5:30
कृत्रिम पावसाच्या प्रयोगाची पुढच्या आठवड्यात सांगता होणार असून, सी बॅण्ड डॉप्लर रडार, विमान, फ्लेअर्स व इतर सामग्री हलविण्यात येणार आहे. ढगांनी दगा दिल्याने प्रयोगाला

कृत्रिम पावसाच्या प्रयोगाची सांगता!
औरंगाबाद : कृत्रिम पावसाच्या प्रयोगाची पुढच्या आठवड्यात सांगता होणार असून, सी बॅण्ड डॉप्लर रडार, विमान, फ्लेअर्स व इतर सामग्री हलविण्यात येणार आहे. ढगांनी दगा दिल्याने प्रयोगाला अपेक्षित यश मिळालेले नाही. एकूण ९० दिवसांचा हा प्रयोग होता. परंतु आता ढगच नसल्याने प्रयोग थांबविण्यात येत आहेत, असे राज्य आपत्ती संचालक सुहास दिवसे यांनी सांगितले.
१४ दिवसांपासून विमान उभे असून, ढगांअभावी त्याचे कुठेही उड्डाण झालेले नाही. हवामान खात्याने मान्सून संपल्याचे जाहीर केले आहे. परिणामी, २७ कोटी रुपये खर्चातून हाती घेण्यात आलेला कृत्रिम पावसाचा प्रयोग आता थांबवावा लागणार आहे. प्रयोग संपण्याची अधिकृत तारीख ४ नोव्हेंबर असली तरी आता पावसाळी ढग दाटून येण्याची शक्यता नाही. त्यामुळे प्रयोग आधीच गुंडाळण्यात येणार आहे.
सुमारे ११० तास विमानाने प्रयोग करून ९५० मि.मी.पर्यंत पाऊस पाडल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. कराराच्या ५० टक्केच उड्डाण झाले असून, १३ कोटी ५० लाख रुपयांचा जास्तीचा खर्च सरकारला कंत्राटदार कंपनीला द्यावा लागणार आहे. २७ कोटींमध्ये ९० दिवस क्लाऊड सीडिंगचा प्रयोग करण्याचे कंत्राट देण्यात आले आहे. ४ आॅगस्टला प्रयोगाला सुरुवात झाली. आॅगस्ट महिन्यात १९, सप्टेंबरमध्ये ११ दिवस क्लाऊड सीडिंग करण्यात आले. आॅक्टोबरमध्ये ५ दिवस विमानाने उड्डाण घेतले. आॅगस्टमध्ये २५४ तर सप्टेंबरमध्ये २५२ मि.मी. पाऊस कृत्रिम प्रयोगातून झाल्याचा दावा करण्यात आला आहे. आॅगस्टमध्ये ३४८, सप्टेंबरमध्ये २०१ असे ५४९ फ्लेअर्स ढगांमध्ये सोडण्यात आले. (प्रतिनिधी)
पुढच्या आठवड्यात प्रयोग थांबेल. रडारच्या साह्याने तयार करण्यात
आलेला डाटा हवामान खात्याला देण्यात येणार आहे. त्याचे विश्लेषण करण्यात येईल. पुढच्या वर्षी त्याचा फायदा होईल. जून २०१६मध्ये प्रयोगाची यंत्रणा तयार असेल. कंपनीला २७ कोटी रुपये द्यावे लागतील. अजून तीन दिवस यंत्रणा औरंगाबादेत राहणार आहे, असे दिवसे यांनी सांगितले.