पाणीटंचाईचा आणखी एक बळी

By Admin | Updated: June 27, 2016 05:05 IST2016-06-27T05:05:47+5:302016-06-27T05:05:47+5:30

मुंब्रा स्थानकातून पाणी घेऊन येणाऱ्या सीताराणी गंगाप्रसाद पटवा (४५) या महिलेचा रेल्वेची धडक लागून मृत्यू झाला.

Another victim of water scarcity | पाणीटंचाईचा आणखी एक बळी

पाणीटंचाईचा आणखी एक बळी


डोंबिवली : दिव्यात भीषण पाणीटंचाई असल्याने मुंब्रा स्थानकातून पाणी घेऊन येणाऱ्या सीताराणी गंगाप्रसाद पटवा (४५) या महिलेचा रेल्वेची धडक लागून मृत्यू झाला. दिव्यातील पाणीटंचाईने दोन व्यक्तींचे असेच बळी गेले आहेत.
ठाणे महापालिकेच्या हद्दीतील दिव्यात भीषण पाणीटंचाई भेडसावत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. पर्याय नसल्याने मुंब्रा स्थानकातून पाणी आणावे लागते. पाणी आणताना रूळ ओलांडताना जीव धोक्यात घालावा लागतो. रविवारी सकाळी अप धीम्या मार्गावर सीताराणी पटवा यांना अपघात झाला. रेल्वे पोलिसांनी सांगितले की, कपडे धुण्यासाठी गेलेल्या सीताराणी पश्चिमेतून पूर्वेला जात होत्या. त्यादरम्यान अप धीम्या मार्गावरून आलेल्या लोकलचा त्यांना अंदाज आला नाही आणि गाडीची धडक लागून त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पती गंगाप्र्रसाद, विनोद, गोविंद, लक्ष्मीनारायण ही तीन मुले, रीना ही मुलगी, गुडिया (सून) असा परिवार आहे. दिव्यात पश्चिमेला रेल्वे रुळांनजीकच्या समांतर रस्त्यालगत असलेल्या साईकुटीर इमारतीत पटवा कुटुंब २००९ पासून वास्तव्याला आहे.
सहा महिन्यांपूर्वी रात्रीच्या वेळी दिव्यातून मुंब्रा स्थानकात पाणी भरण्याच्या निमित्ताने गेलेल्या एका नागरिकाचा लोकलची धडक लागून मृत्यू झाला होता. केवळ पाणीटंचाईमुळे पाण्याच्या शोधात अन्यत्र जाणाऱ्या नागरिकांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. असे असतानाही ठाणे महापालिका प्रशासन नागरिकांची अडचण सोडवण्यासाठी कोणतीही प्रभावी उपाययोजना करीत नाही. केवळ अश्वासने देते. येथील नगरसेवक निष्क्रिय असून दिवावासीयांची स्थिती अतिशय गंभीर होत असल्याची संतप्त प्रतिक्रिया नागरिकांमधून व्यक्त झाली. ठाणे रेल्वे पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Another victim of water scarcity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.