शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात हल्ल्याची तयारी, पाकिस्तानी कनेक्शन उघड; दहशतवादी बिलालच्या चौकशीतून धक्कादायक खुलासे
2
Operation Pimple : सैन्याला मोठं यश! कुपवाडामध्ये घुसखोरी करणाऱ्या २ दहशतवाद्यांचा खात्मा
3
शेजाऱ्याशी लफडं, गुपित पतीला कळलं; प्रियकरासोबत मिळून पत्नीने केली हत्या, मृतदेह नदीत फेकला
4
उद्धव ठाकरेंसमोर व्यथा मांडताना ९० वर्षीय शेतकऱ्याला रडू कोसळले; म्हणाले, “कर्जमाफी...”
5
IND vs AUS 5th T20I : तिलक वर्माला बसवलं बाकावर! टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये रिंकूची एन्ट्री
6
जरीन खान यांच्यावर हिंदू पद्धतीने झाले अंत्यसंस्कार, मुलगा झायेदने दिला अग्नी; कारण...
7
कतरिना कैफचे सासरे 'आजोबा' बनल्यानंतर झाले भावुक! 'ज्युनिअर कौशल'साठी शेअर केली प्रेमळ पोस्ट
8
"महाराष्ट्र लुटून खा... आम्ही...! मंत्री सरनाईकांनी २०० कोटींची जमीन ३ कोटीत घेतली", वडेट्टीवारांचा गंभीर आरोप
9
राहू-केतू गोचर २०२५: राहू केतू तसे तापदायकच, पण नोव्हेंबरमध्ये 'या' ८ राशींवर होणार मेहेरबान!
10
Railway: धावत्या ट्रेनला गरुडाची समोरून धडक, जखमी होऊनही लोको पायलटनं प्रसंगावधान दाखवलं, नाही तर...
11
अजबच...! नकळत लग्न झालं...! अमेरिकन पॉप स्टारचा मलेशियन सुलतानशी 'निकाह', आता 'तलाक'ची मागणी; नेमकं प्रकरण काय?
12
“प्रत्येक भारतीयाला वंदे भारत ट्रेनचा अभिमान”: PM मोदी, वाराणसीतून ४ नव्या सेवांचे लोकार्पण
13
"ओए होए छोटा छावा...", विकी कौशल-कतरिना कैफच्या पोस्टवर संतोष जुवेकरची कमेंट
14
७ वर्षांनंतर अनुष्का शर्मा करणार कमबॅक! 'चकदा एक्सप्रेस' OTTवर होणार रिलीज?
15
एका चपातीमध्ये किती कॅलरीज असतात, वजन कमी करण्यासाठी रात्री किती खाव्यात?
16
Crime:  "काका वारले, मुलंही सारखी आजारी पडतात", जादूटोण्याचा संशयातून जन्मदात्या आईची हत्या!
17
IND vs AUS:"कभी शेर को घास खाते हुए देखा है क्या?" सूर्या भाऊनं केली अभिषेकची थट्टा; व्हिडिओ व्हायरल
18
कतरिना कैफने ४२ व्या वर्षी दिला मुलाला जन्म, कशी आहे तब्येत? रुग्णालयाने शेअर केलं अपडेट
19
Video: मराठी अभिनेत्रींनी केलं सोहम बांदेकरचं केळवण; आदेश-सुचित्रा बांदेकरांची होणारी सून कोण?
20
Gardening Tips: बटाट्याची सालं फेकू नका, रोपांसाठी ठरते सुपरफूड; वापर कसा करायचा ते पाहा 

आणखी एक पोलीस शहीद झाला एवढंच...

By admin | Updated: August 31, 2016 18:45 IST

कायदा तोडणाऱ्या तरूणांच्या बेदम मारहाणीमुळे कॉन्स्टेबल विलास शिंदेंचा मृत्यू झाला आहे. लीलावतीमध्ये उपचार सुरू असताना, शिंदेंची प्राणज्योत मालवली.

- शिवराज यादव / ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 31 - अखेर कायदा तोडणाऱ्या तरूणांच्या बेदम मारहाणीमुळे कॉन्स्टेबल विलास शिंदेंचा मृत्यू झाला. 23 तारखेला आपलं कर्तव्य बजावणाऱ्या शिंदेंची चूक एवढीच होती की त्यांनी हेल्मेट न घालता दुचाकी चालवणाऱ्या अल्पवयीन मुलाला हटकलं होतं. त्या मुलानं त्याच्या मोठ्या भावाला बोलावलं आणि शिंदेंना बांबूने मारहाण केली. लीलावतीमध्ये उपचार सुरू असताना, शिंदेंची प्राणज्योत मालवली.
 
या महानगरीत रोज छोटे छोटे हादसे तर होतच असतात, कित्येक जण प्राणाला मुकतात, आणखी एक गेला तर काय फरक पडतो, भलेही मग तो कायद्याचं रक्षण करणारा पोलीस का असेना? समाजाच्या अशा निर्ढावलेल्या मनोवृत्तीमुळे अत्यंत अडगळीत गेलेल्या या शिंदेंच्या मारहाणीला खऱ्या अर्थाने वाचा फोडली मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी... त्यांनी काल शिंदे यांची रूग्णालयात केवळ भेटच नाही घेतली, तर मुस्लीम तरूण मोठ्या प्रमाणावर कायदे मोडत असल्याचा थेट आरोप केला. राज ठाकरेंच्या भेटीनंतर या मारहाणीला वाचा फुटली आणि हिंदू-मुस्लीम अंगाने त्यावर चर्चा झडायला लागल्या. 
 
(वाहतूक पोलिस विलास शिंदे यांचे निधन, दुचाकीस्वाराने केली होती मारहाण)
(मारहाणीत जखमी झालेल्या पोलिसाची राज ठाकरे यांनी घेतली भेट)
 
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एका कार्यक्रमात पोलीस कॉन्स्टेबल विलास शिंदे यांच्यावर मुस्लिम तरुणांनी केलेल्या हल्ल्याचा उल्लेख केला आणि अचानक सर्वांना ही बातमी आठवली. मग सगळ्यांची धावपळ सुरु झाली, चर्चासत्र आयोजित केले गेले. रोज पोलिसांना शिव्यांची लाखोली वाहणारे मुंबईकर हिंदू आणि मुस्लिम धर्मावर मत मांडू लागले. रोज घरासमोरच्या सिग्नलवर कधी 12 तास तर कधी 24 तास उभे असणा-या त्या पोलीस कॉन्स्टेबलकडे हसतमुखाने पाहण्याचं कष्ट न घेणा-या प्रत्येकाला पोलीस माणूस असतो याची आठवण झाली.
 
दुसरा दिवस उजाडला, विलास शिंदे स्मरणातून जाणार इतक्यात त्यांचं निधन झाल्याची बातमी येऊन धडकली. लिलावती रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं. काय चूक होती त्यांची, इतकीच की बाईक चालवताना सुरक्षित घरी पोहोचावं यासाठी तरुणांना हेल्मेट घालण्याची सक्ती त्यांनी केली. कायदा समजावला म्हणून चक्क दांडक्याने डोक्यात मारलं. 
पण बरं झालं तुमचं निधन झालं विलास शिंदे. तुम्ही जिवंत असता तर तुम्हाला जास्त त्रास सहन करावा लागला असता. खरं सांगतो...जास्तीत जास्त एक महिना तुमच्या घराबाहेर सर्व न्यूज चॅनेलच्या ओबी व्हॅन उभ्या राहिल्या असत्या. प्रत्येक चॅनेलच्या एक रिपोर्टरची ड्यूटी तुमच्या घराबाहेर लागली असती. प्रत्येक राजकीय पक्षाच्या नेत्याने हक्काने कळवळा येऊन तुमच्या घरी हजेरी लावली असती. तुमच्या गृहखात्याने तर तुमचा पगार सुरु ठेवला असता पण मग रिटायर्ड झाल्यावर लगेच घर खाली करा अशी नोटीसही पाठवली असती. तुमच्यावर हल्ला झाला होता हे एव्हाना तुमचं खातंही विसरुनही गेलं असतं. आणि मग एक दिवस मी त्या दिवशीच का नाही मेलो हा विचार तुम्ही करत बसला असता.
 
सरकारी नोकरी करावी म्हणून गावची शेती सोडून पोलीस खात्यात भरती झालेला पोलीस हा देखील एक माणूसच असतो. पण सरकारला कदाचित ते यंत्र वाटत असावेत. पोलिसांच्या मुलांना विचारा किती वेळा त्यांच्या वडिलांनी त्यांना पिकनिकला किंवा फिरायला नेलं आहे. नाही आठवणार....कारण जेव्हा सगळे सण साजरे करत असतात ना तेव्हा एखाद्या मंडपाच्या बाहेर उभं राहून रांगा सोडण्याचं कामं या सरकारी नोकरावर सोपवलेलं असतं. आणि या मोबदल्यात तुटपूंजा पगार त्यांना मिळत असतो.
 
गेली 40 वर्ष मुंबईत नोकरी करणा-या या पोलिसाला साधं हक्काचं घरं हे सरकार देऊ शकलं नाही. याउलट निवृत्त झाल्यावर हाकलून घराबाहेर काढतात. 
कधी वेळ मिळाला तर पोलिसांसाठी असलेल्या क्वार्टर्समध्ये जाऊन नक्की फिरुन या...घराला पडलेल्या भेगा, भिंतीवरच्या निघालेल्या खपल्या, पावसाळ्यात गळणारं घरं, डांबराची गच्ची ज्या आग ओकत असतात हे पाहून तुम्हालाही वाईट नाही वाटलं तर नक्की सांगा. घरात फक्त चार माणसं झोपू शकतील एवढीच जागा, पाचवा पाहुणा आला की घरात झोपायचे वांदे...1927 साली या इमारती बांधलेल्या आहेत हे सांगताना कदाचित सरकारची मान ताठ होईल, पण इतक्या वर्षात पोलिसांसाठी साधी घरं बांधावीशी वाटली नाही ही कोणत्या अभिमानाची गोष्ट आहे हेदेखील नक्की सांगावं.
 
इतकं करूनही पोलीसांना मिळतं काय? तर अवहेलना... राजकारणी झोडपतात, समाज तिरस्कार करतो आणि गावगुंड येता जाता टपल्या मारतात, कधी कधी जीव घेतात विलास शिंदेंसारखा... आठवतंय ना, राम कदमांनी विधानसभेतच पोलीसांना मारहाण केली होती... आमदार क्षितिज ठाकूरनं सी लिंकवर अडवणाऱ्या पोलीसाला विधानसभेत बोलावून मारलं होतं. ठाण्यामध्ये शिवसेनेच्या एका पदाधिकाऱ्याने महिला पोलीसाला मारहाण केली होती. तर भिवंडीमध्ये तर दोन पोलीसांना काही वर्षांपूर्वी जिवंत जाळलं होतं. पोलीसांना कस्पटासमान वागवणाऱ्या या सगळ्या प्रकरणांचं काय झालं हे माहित असणं सोडा, किती जणांच्या लक्षात हे प्रकार राहिलेत हा देखील संशोधनाचा विषय आहे.
स्कॉटलंड यार्डशी म्हणे मुंबई पोलीसांची तुलना व्हायची... त्यावेळी कदाचित पोलीस राजकारण्यांच्या हातचं बाहुलं बनलं नसावं. पण, आज तशी स्थिती नाहीये. समाजकंटकांवर कारवाया करण्यासाठी जे जबरदस्त बॅकिंग लागतं, ते ना आधीच्या सरकारांनी दिलं ना फडणवीस सरकार देतंय. परिणामी महाराष्ट्र पोलीसांची अवस्था सर्कशीतल्या वाघासारखी झाली आहे. ज्याच्या डरकाळीनं ज्यांची चड्डी ओली व्हावी, ते आज पिंजऱ्याबाहेरून दगडं मारतायत, ज्यामध्ये शिंदेंसारखा एखादा वाघ मरतो, ज्याचं कुणालाच सोयरसूतक नाहीये. इथं तर हा पोरगा अल्पवयीन असल्याचं सांगितलं जातंय, म्हणजे जास्तीत जास्त तीन वर्षांचा बालसुधारगृह... बास्स हीच किंमत पोलीस कॉन्स्टेबलच्या जीवाची...
 
समाजावरील अत्याचार निर्मूलनासाठी सदरक्षणाय, खल निग्रहणाय हा वसा माथी मारला गेलेल्या पोलीसांना संप करता येत नाही म्हणून... नाहीतर कदाचित भारताच्या इतिहासातला सगळ्यात मोठा संप पोलीसांनीच केला असता. कुणी सांगावं सरकारच्या नामर्दपणाला कंटाळून कुणी खाकीवाला संप नसेल करत, पण मंत्र्यांच्या तोंडावर राजीनामा फेकत असेल!
 
उद्या सर्व वृत्तपत्रांच्या पहिल्या पानावर ही बातमी असेल. सकाळी मुलगा आपल्या वडिलांना मलाही एकदा असंच पकडलं होतं सांगताना आपण कसे पैसे देऊन सुटलो सांगत असेल. पोलिसांच्या बायका हे सरकारपण आबांच्या सरकारसारखंच आहे सांगत स्वयंपाकाला लागतील. एखादा पोलीस कॉन्स्टेबल त्यावेळी ती बातमी वाचताना उद्या माझा नंबर तर नाही विचार करत खाकी चढवेल, आणि एखाद्या सिग्नलवर उभं राहून कायदा तोडणा-यांवर कारवाई करु की नको ? याचा विचार करत उभा असेल...सरकार मात्र तेव्हाही पोलिसांसाठी योजना आणण्यासाठी मंत्रालयात चर्चा करत असेल