अण्णा हजारे घेणार मुख्यमंत्र्यांची भेट
By Admin | Updated: July 2, 2016 03:39 IST2016-07-02T03:39:37+5:302016-07-02T03:39:37+5:30
२७ गावांची स्वतंत्र नगरपालिका स्थापन करावी, या मागणीसाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आठवडाभरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार

अण्णा हजारे घेणार मुख्यमंत्र्यांची भेट
चिकणघर : कल्याण-डोंबिवली महापालिकेत समाविष्ट झालेल्या २७ गावांची स्वतंत्र नगरपालिका स्थापन करावी, या मागणीसाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आठवडाभरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत, अशी माहिती २७ गावे सर्वपक्षीय संरक्षण संघर्ष समितीचे सरचिटणीस चंद्रकांत पाटील यांनी ‘लोकमत’ला दिली.
संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी हजारे यांची पुन्हा गुरु वारी राळेगणसिद्धी येथे भेट घेतली. या वेळी अध्यक्ष गंगाराम शेलार, सरचिटणीस पाटील, उपाध्यक्ष अर्जुन बुवा चौधरी आदी उपस्थित होते.
समितीने यापूर्वी २० जूनला हजारे यांची भेट घेतली होती. त्यानंतर, दुसऱ्याच दिवशी त्यांच्या भ्रष्टाचार निर्मूलन समितीचा पदाधिकारी असल्याचे भासवून महेश निंबाळकर यांनी संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यावरच २७ गावांतील बेकायदा बांधकामे करून अनियमितता केल्याचा आरोप करणारे पत्रक सोशल मीडियावर व्हायरल केले होते. त्यासंदर्भात हजारे यांना स्पष्टीकरण देण्यासाठी ही मंडळी गेली होती. मात्र, आपण सर्व समित्या कधीच बरखास्त केल्या आहेत. बदनामी करणाऱ्यांविरोधात पोलिसांत तक्र ार नोंदवण्याचा सल्ला या वेळी हजारे यांनी संघर्ष समितीला दिला. त्यानुसार, समिती निर्णय घेणार आहे, असे एका पदाधिकाऱ्याने सांगितले.
२७ गावे सर्वपक्षीय हक्क संरक्षण संघर्ष समिती २० वर्षांपासून प्रामाणिकपणे नागरी हक्कांसाठी लढा देत आहे. तो यापुढेही सुरूच राहील. समितीच्या विरोधकांना ते अडचणीचे ठरत आहे. म्हणून, कुणाला तरी पुढे करून समितीला बदनाम करण्याचा प्रयत्न होत आहे. यासाठी आम्ही आमची खरी बाजू मांडण्यासाठी हजारे यांची भेट घेतली.
- अर्जुन बुवा चौधरी, उपाध्यक्ष, २७ गावे सर्वपक्षीय संघर्ष समिती