तर अंगणवाडी कर्मचारी विधानसभेवर धडकणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2016 03:30 IST2016-10-18T03:30:16+5:302016-10-18T03:30:16+5:30
महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाचे अध्यक्ष एम.ए. पाटील यांनी वाडा येथे मोर्चात बोलताना दिला.

तर अंगणवाडी कर्मचारी विधानसभेवर धडकणार
वाडा : अंगणवाडी कर्मचा-यांचे अनेक प्रश्न प्रलंबित असून ते तातडीने सोडविले नाहीत तर येत्या हिवाळी अधिवेशनात लाखोंच्या संख्येने अंगणवाडी कर्मचारी धडक देतील असा गंभीर इशारा महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाचे अध्यक्ष एम.ए. पाटील यांनी वाडा येथे मोर्चात बोलताना दिला.
अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नाकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा यांच्या घरावर मोर्चाचे आयोजन केले होते. मात्र पोलिसांनी घरावर मोर्चा काढण्यास परवानगी नाकारल्याने मोर्चेकरांनी प्रांत कार्यालयावर मोर्चा काढला. मोर्चाला संबोधित करताना एम.ए. पाटील पुढे म्हणाले, की अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे प्रश्न हे आदिवासी विकास विभाग, महिला व बालकल्याण विभाग व आरोग्य विभाग या तिघांशी निगडीत असून या तिन्ही मंत्र्यांनी एकत्रित येऊन अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांचा विचार करून त्यावर तोडगा काढावा. अंगणवाडी लाभार्थीना दिवसाला ४ रूपये ९२ पैशाचा आहार शासन देत आहे. पंरतु हे पैसे फारच अल्प आहेत. आजच्या महागाईमध्ये ४ रूपये ९२ पैशांमध्ये लाभार्थीना खूप कमी आहार मिळतो. लाभार्थीना एकवेळचा तरी पोटभर आहार द्यावा तसेच आहारासाठी खर्च झालेले पैसे सहा सहा महिन्यात देण्याची पध्दत बंद करून प्रत्येक महिन्यात आहारासाठी खर्च झालेले पैसे त्या त्या बचतगटांना देण्यात यावेत यामुळे लाभार्थाच्या आहारामध्ये खंड पडणार नाही असे संघाचे सरचिटणीस बृजपाल सिंह यांनी आपल्या भाषणात सांगितले. (वार्ताहर)
कुपोषणाचे प्रमाण वाढत चालले असून बालमृत्यू होत असून ते थांबविण्यासाठी शासनाने काय केले पाहिजे या व अन्य मागण्यांचे निवेदन तहसीलदार संदीप चव्हाण यांना देण्यात आले. यावेळी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाचे अध्यक्ष एम.ए. पाटील, सरचिटणीस बृजपाल सिंह, उपाध्यक्षा मंगला सराफ, विनिता देशमुख यांच्यासह जिल्हयातील अंगणवाडी कर्मचारी उपस्थित होते.