अन् बिग बी म्हणाले, हॅलो रितेश!
By Admin | Updated: August 21, 2014 01:08 IST2014-08-21T01:08:55+5:302014-08-21T01:08:55+5:30
समजा तुम्हाला फोन आला आणि समोरच्या व्यक्तीने असे म्हटले की ‘मै अमिताभ बच्चन बोल राहा हूँ’ तर तुमचा विश्वासच बसणार नाही! कुणीतरी आपली मस्करी करत असल्याचे तुम्हाला वाटेल,

अन् बिग बी म्हणाले, हॅलो रितेश!
केबीसीचा पहिला जॅकपॉट नागपुरात : बक्षिसाच्या रकमेतून करणार बहिणीचे लग्न
नागपूर : समजा तुम्हाला फोन आला आणि समोरच्या व्यक्तीने असे म्हटले की ‘मै अमिताभ बच्चन बोल राहा हूँ’ तर तुमचा विश्वासच बसणार नाही! कुणीतरी आपली मस्करी करत असल्याचे तुम्हाला वाटेल, मात्र नागपूरच्या रितेशला खरचं अमिताभ बच्चनचा फोन आला आणि तो क्षण त्याच्या जीवनातील अविस्मरणीय क्षण ठरला. रितेश कुर्जेकर हा ‘कौन बनेगा करोडपती’ च्या या पर्वातील पहिला जॅकपॉट विजेता ठरला आहे. त्याला ‘घर बैठे जितो जॅकपॉट’ च्या माध्यमातून तब्बल तीन लाख रुपये बक्षिसाच्या रूपात घोषित झाले असून तो या पैशांतून आपल्या लहान बहिणीचे लग्न करणार आहे.
नागपूरनजीकच्या मौदा येथील मूळचा रितेश धनराज कुर्जेकर सर्वसामान्य कुटुंबातला आहे. त्याचे वडील मौदा पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत आहे. त्याची आई गृहिणी आहे. रितेशला दोन बहिणी आहेत. एकीचे लग्न झाले असून एक बहीण बी.एड. करीत आहे. रितेशला अधीपासूनच कौन बनेगा करोडपती (केबीसी)बद्दल आकर्षण होते. तो मागील तीन वर्षांपासून या शोच्या ‘घर बैठे जितो जॅकपॉट’ च्या प्रश्नांचे उत्तर एसएमएस करीत असे. शेवटी २५ जुलैला रितेशला सोनी वाहिनीकडून फोन आला. रितेश तुम्ही ‘घर बैठे जितो जॅकपॉट’ च्या विजेत्यांच्या यादीत आले आहात, असा संदेश त्याला देण्यात आला. दुसऱ्या दिवशी परत सकाळी १० वाजता रितेशला फोन आला. असे तीन चार फोन रितेशला आलेत. शेवटी आज सायंकाळी ७ वाजेपर्यंत तुम्हाला फोन येऊ शकतो, असे सांगण्यात आले. अखेर रात्री ९:३० वाजता फोन आला. हॅलो रितेश... तो म्हणाला हा...‘‘मै अमिताभ बच्चन बोल राहा हू कोैन बनेगा महाकरोडपती से...तेव्हा रितेशला धक्का बसला. ‘च्या आयला अमिताभ’ असे शब्द त्याच्या तोंडून निघाले.
रितेश म्हणाला ‘‘माय गॉड आय कान्ट बिलिव्ह इट सर..इट्स माय प्लेझर टू हियर यू. तेव्हा अमिताभ म्हणाले ‘‘अभी तो हम मिले नही है, मिलेंगे तब खुश होना. रितेश आप एक लाख रुपये जिते हो आपका आभिनंदन! क्या आप तीन लाख के लिए खेलना चाहोगे’’...तेव्हा मी खेळणार नव्हतो मात्र माझ्या बहिणीने आग्रह केला आणि मी हो म्हणालो...अभिताभ यांनी मला प्रश्न विचारला की यापैकी ‘कोणते शहर दोन राज्यांची राजधानी आहे’ व आॅप्शन वाचून दाखविले. तेव्हा मी लगेचच हैदराबाद असे उत्तर दिले. सही जवाब म्हणत टाळ्याचा आवाज आला. अन् फोन कट झाला. बस तो आवाज आज देखील माझ्या कानात गुंजत आहे. मला आज देखील विश्वास बसत नाही की मी अमिताभ बच्चनसोबत बोललो.
मात्र एक लाखावर जे अधिकचे दोन लाख रुपये जिंकलो. ते माझ्या बहिणीच्या पाठिंब्यामुळे तेव्हा ही रक्कम मी माझ्या लहान बहिणीच्या लग्नासाठी ठेवणार असल्याचे रितेशने लोकमतशी बोलताना सांगितले. आता रितेशला ‘हॉट सिट’वर बसायचे असून त्याची तयारी म्हणून की काय तो आता स्पर्धा परीक्षेच्या तयारीला लागला आहे. त्याला आयबीपीएसची परीक्षा देऊन आयटी आॅफिसर व्हायचे आहे.(प्रतिनिधी)
असे वाटते की सेलिब्रिटी झालो
१८ आॅगस्टला माझा अमिताभसोबत झालेला संवाद साऱ्या जगाने ऐकला त्यानंतर मला मोठ्या प्रमाणावर फोन कॉल सुरू झाले. अनेक जुन्या मित्रांशी बोलणे झाले. अभिनंदनाचा वर्षाव माझ्या फेसबुक वॉल वर करण्यात आला. शेकडो फ्रेन्ड रिक्वेस्ट आल्या आहेत. गावात येता जाता लोक मला हात दाखवून विचारपूस करतात. ‘अरे हाच तो रितेश’ असे शब्द देखील कानावर पडतात. असे वाटते जणू मी सेलिब्रिटी झालो आहे.