बळीराजासाठी झटणारा ‘आनंद’

By Admin | Updated: August 26, 2014 01:01 IST2014-08-26T01:01:32+5:302014-08-26T01:01:32+5:30

ज्या वयात लोक आधार शोधतात, त्या वयात नागपुरातील एक दाम्पत्य शेतकऱ्यांचा आधार बनले आहे. शेतकऱ्यांसाठी त्यांनी केलेले कार्य समाजाच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारे आहे.

'Anand' for the victims | बळीराजासाठी झटणारा ‘आनंद’

बळीराजासाठी झटणारा ‘आनंद’

दर महिन्याला शेतकऱ्यांना मदत : अपेक्षा केवळ आत्महत्या थांबाव्यात
नागपूर : ज्या वयात लोक आधार शोधतात, त्या वयात नागपुरातील एक दाम्पत्य शेतकऱ्यांचा आधार बनले आहे. शेतकऱ्यांसाठी त्यांनी केलेले कार्य समाजाच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारे आहे. आनंद व माधवी सोवनी असे या दाम्पत्याचे नाव असून, पेन्शनमधून मिळालेल्या रकमेतून ते दर महिन्याला पीडित शेतकऱ्यांना २००० रुपयांची मदत करीत आहे.
विदर्भात शेतकऱ्यांची आत्महत्या हा विषय अतिशय गंभीर आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांवर राजकारण करताना आपण बघतो, त्यातून स्वत:ची पोळी शेकण्याचा अनेक जण प्रयत्न करतात. मात्र त्यांना प्रत्यक्ष मदत करण्यासाठी कुणीही पुढे येत नाही. करोडो रुपयांची संपत्ती गोळा करूनही, शेतकऱ्यांना मदत करण्याची दानत कुणाचीही दिसत नाही. मात्र नागपुरातील ७२ वर्षीय आनंद सोवनी या संवेदनशील वृद्धाला जगाच्या पोशिंद्याच्या होणाऱ्या आत्महत्या बोचतात.
शेतकऱ्यांची अवस्था त्याला बघवत नाही. त्यामुळे अशा पीडित शेतकऱ्यांना आपल्या मिळकतीतून काही मदत ते दर महिन्याला करतात. करोडो कमावल्यानंतरही शेतकऱ्यांसाठी एक रुपया देण्याची ज्यांची दानत नाही, तिथे हे दाम्पत्य दर महिन्याला आपल्या पेन्शनमधून २००० रुपयांची मदत शेतकऱ्यांना करतात. २००४ पासून त्यांनी हे अभियान हाती घेतले आहे. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या शेतकऱ्यांच्या अवस्थेवर आधारित ‘असूड’ या पुस्तकातून प्रभावित झालेले सोवनी हे वृत्तपत्रातील शेतकऱ्यांच्या अवस्थेविषयीच्या बातम्या वाचून अतिशय अस्वस्थ व्हायचे. पोटासाठी संघर्ष करणाऱ्या भिकाऱ्याला, अपंगाला आत्महत्या का कराविशी वाटत नाही. उद्योजक, व्यापारी, नोकरदार का आत्महत्या करीत नाही. शेतकरीच का आत्महत्या करतो, या प्रश्नाचे उत्तर शोधण्यात ते अस्वस्थ व्हायचे. शेवटी त्यांनी स्वत:च शेतकऱ्यांना मदत करण्याचा निर्णय घेतला. २६ मार्च २००४ रोजी त्यांनी पहिला मनीआॅर्डर आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना पाठविला आणि तेव्हापासून दर महिन्याला ते मनीआॅर्डर करून शेतकऱ्यांना मदत करीत आहेत. आजपर्यंत त्यांनी २८६ शेतकऱ्यांना १,६०,००० रुपयांची मदत केली आहे.
शेतकऱ्यांची माहिती गोळा करण्यासाठी ते वर्तमानपत्राच्या कात्रणाची मदत घेतात. वर्तमानपत्राच्या कात्रणातून पीडित, दु:खी, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या घरचा पत्ता ते शोधतात. त्यांच्या डायरीत आत्महत्या केलेल्या व गंभीर परिस्थिती असलेल्या ६६८० शेतकऱ्यांची माहिती नमूद आहे. आजपर्यंत केलेल्या मदतीची पोचपावती त्यांच्याकडे आहे. याशिवाय हे दाम्पत्य अनाथ, अपंग संस्थेलाही मदत करतात. आपल्या पेन्शनमधून ५१ टक्के हिस्सा मदतीसाठी काढून ठेवतात. दररोज आनंद सोवनी बिस्किटांचे पुडे रस्त्यावर काम करणाऱ्या मजुरांच्या मुलांना वाटतात. यासाठी त्यांना काटकसर करावी लागते, मात्र त्यांना याचे समाधान आहे. आपण जिवंत असेपर्यंत हे कार्य अव्याहतपणे करणार असल्याचा वसा त्यांनी घेतला आहे.
आदर्श जीवन जगतात
आपल्या घासातील घास इतरांसाठी ठेवताना, त्यांना काटकसर करावी लागते. अतिशय साधे जीवन ते जगतात. आजही त्यांच्या घरातील टीव्ही रिमोटलेस आहे. त्यांनी केबल लावलेला नाही. घरातील फर्निचरही जुनेच आहे. कुठलेही अत्याधुनिक विद्युत उपकरणे त्यांच्या घरात नाही. स्वत:चे वाहन नाही, दोघांजवळ एकच मोबाईल आहे. विजेचा वापर ते काटकसरीने करतात. इनव्हरर्टर न लावण्यामागे त्यांची भावना अतिशय व्यापक आहे, ते म्हणतात, गावातील शेतकरी दिवसभर विजेविना राहू शकतो, आपण साधे तीन तास सहन करू शकत नाही. साधे खानपान, साधी राहणी त्यांची आहे. यासाठी त्यांची पत्नी माधवीचे त्यांना पूर्ण सहकार्य आहे. विशेष म्हणजे त्यांची मुले अमेरिकेत आहेत. असे असतानाही कुठलीही मदत न घेता, एक आदर्श जीवन ते जगत आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: 'Anand' for the victims

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.