४३ शहरांत अमृत अभियान
By Admin | Updated: October 1, 2015 03:19 IST2015-10-01T03:19:41+5:302015-10-01T03:19:41+5:30
केंद्र शासनातर्फे राबविण्यात येणाऱ्या अटल मिशन फॉर रिज्युव्हनेशन या महत्त्वाकांक्षी अभियानाची राज्यामध्ये अंमलबजावणी करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.

४३ शहरांत अमृत अभियान
मुंबई : केंद्र शासनातर्फे राबविण्यात येणाऱ्या अटल मिशन फॉर रिज्युव्हनेशन अँड अर्बन ट्रान्सफॉर्मेशन (अमृत) या महत्त्वाकांक्षी अभियानाची राज्यामध्ये अंमलबजावणी करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. या अभियानात राज्यातील ४३ शहरांचा समावेश करण्यात आला आहे.
शहरातील प्रत्येक घरासाठी प्रचलित निकषानुसार पाणीपुरवठा, सार्वजनिक स्वच्छतेसाठी मलनि:स्सारण, मलव्यवस्थापन व पर्जन्यजल वाहिनीची व्यवस्था करण्यासह शहरांतील मोकळ्या जागा, हरित क्षेत्रे, परिवहन व्यवस्था यांमध्ये सुधारणा करून प्रदूषण कमी करणे तसेच इतर सुविधांची निर्मिती या उद्दिष्टांच्या पूतर्तेसाठी हे अभियान राबविण्यात येत आहे.
केंद्राने ५०० शहरांचा समावेश अमृतमध्ये केला असून, राज्यातील ४३ शहरांचा समावेश आहे. २०१५-१६ ते २०१९-२० या कालावधीसाठी हे अभियान राबविण्यात येणार आहे. केंद्र शासनाकडून या आर्थिक वर्षासाठी एक हजार तीन कोटींचा निधी उपलब्ध होणार आहे. (विशेष प्रतिनिधी)
-----------------
बृहन्मुंबई मनपा, ठाणे, कल्याण-डोंबिवली, मीरा-भाईंदर, नवी मुंबई, भिवंडी-निजामपूर, उल्हासनगर या महानगरपालिका, अंबरनाथ व बदलापूर नगर परिषदा, वसई-विरार महानगरपालिका, पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, नाशिक व मालेगाव या दोन मनपा, जळगाव मनपा व भुसावळ नगर परिषद, सोलापूर मनपा व बार्शी नगर परिषद, कोल्हापूर मनपा व इचलकरंजी नगर परिषद, लातूर जिल्ह्यामधील लातूर मनपा व उदगीर नगर परिषद, अमरावती जिल्ह्यातील अमरावती मनपा व अचलपूर नगर परिषद, वर्धा जिल्ह्यातील वर्धा मनपा व हिंगणघाट नगर परिषद, तसेच सातारा नगर परिषद, सांगली-मिरज महानगरपालिका, औरंगाबाद मनपा, अहमदनगर मनपा, परभणी मनपा, जालना नगर परिषद, नांदेड-वाघाळा मनपा, बीड नगर परिषद, अकोला मनपा, धुळे मनपा, चंद्रपूर मनपा, रायगड जिल्ह्यातील पनवेल नगर परिषद, गोंदिया नगर परिषद, यवतमाळ नगर परिषद, उस्मानाबाद नगर परिषद, नंदूरबार नगर परिषद आणि नागपूर मनपा अशा एकूण ४३ शहरांचा समावेश आहे.