पाणीवाटपामध्ये दौैंडवर कायमच अन्याय
By Admin | Updated: March 6, 2017 01:26 IST2017-03-06T01:26:15+5:302017-03-06T01:26:15+5:30
धरणातील पाण्याचा हक्क हा प्रथम दौंडकरांचा आहे.

पाणीवाटपामध्ये दौैंडवर कायमच अन्याय
वरवंड : दौंड तालुक्यामध्ये सर्वांत जास्त पुनर्वसन झाले आहे. यामुळे धरणातील पाण्याचा हक्क हा प्रथम दौंडकरांचा आहे. मात्र, पाणीवाटपामध्ये ग्रामीण भागावर नेहमीच अन्याय का होतो, असा सवाल दौैंडमधील शेतकऱ्यांनी केला.
वरवंड येथे पाणी नियोजन बैठक आयोजित केली होती. यात उपस्थितांनी तीव्र भावना व्यक्त केल्या.
खडकवासला धरणातून मिळणाऱ्या हक्काच्या पाण्यासाठी वारंवार झगडावे लागत आहे. साखळी पद्धतीने पाणी मिळत असते. मात्र, हे पाणी सहजासहजी मिळणे आता शक्य राहिलेले नाही. कारण वारंवार या पाण्यासाठी आंदोलन करावे लागत आहे.
बैैठकीत भीमा पाटसचे माजी संचालक महेश भागवत बोलताना म्हणाले, की फेब्रुवारीनंतर पाण्याची चर्चा सुरू होते. खडकवासल्याच्या पाण्याचे योग्य नियोजन झाल्याशिवाय पाणी मिळणे शक्य नाही. मात्र, पाणीवाटपामध्ये ग्रामीण भागावर अन्याय का होत आहे? याकडे लक्ष देण्याची गरज आहे. पुण्याची लोकसंख्या ही झपाट्याने वाढत आहे, त्यांनी पाण्याचे नियोजन करणे गरजेचे आहे. मात्र, यामुळे आपले पाणी कमी होत आहे. पुणे शहराला मुळशी धरणातून पाणी उपलब्ध होऊ शकते. खडकवासल्याचे पाणी आपल्या हक्काचे आहे.
भाजपाचे जिल्हा सरचिटणीस तानाजी दिवेकर म्हणाले, की पाणी हे जीवन आहे. आंदोलन करण्यात आमचे आयुष्य गेले आहे. त्या पाण्यावर ग्रामीण भागातील जनतेचा अधिकार आहे. याबाबत न्यायासाठी जलआयोग व न्यायालयात आपल्याला जावे लागणार आहे.
या वेळी सत्वशील शितोळे, अशोक फरगडे, किशोर दिवेकर, लक्ष्मण दिवेकर, राजेंद्र देशमुख, विठ्ठल दिवेकर, केशव दिवेकर, दत्तात्रय दिवेकर, योगिनी दिवेकर यांनी मनोगत व्यक्त केले. या वेळी शेतकरी अंकुश दिवेकर, वाल्मीक सातपुते, मनोहर सातपुते, संदीप दिवेकर, सतीश राऊत, सरपंच संजय खडके, उपसरपंच नाना शेळके, शिवाजी शेलार, दिलीप दिवेकर, बापू बारवकर व ग्रामस्थ उपस्थित होते. (वार्ताहर)