शाहू विचारांतच सर्व उत्तरे
By Admin | Updated: June 27, 2016 04:58 IST2016-06-27T04:58:28+5:302016-06-27T04:58:28+5:30
देशापुढील आजच्या आर्थिक, सामाजिक अशा सर्वच प्रश्नांची उत्तरे राजर्षी शाहू महाराजांच्या अलौकिक विचारांमध्ये आहेत.

शाहू विचारांतच सर्व उत्तरे
कोल्हापूर : देशापुढील आजच्या आर्थिक, सामाजिक अशा सर्वच प्रश्नांची उत्तरे राजर्षी शाहू महाराजांच्या अलौकिक विचारांमध्ये आहेत. त्यांनी देशातील परिवर्तनाच्या चळवळीला दृष्टी देण्याचे काम केले. असा थोर राजा या नगरीमध्ये होऊन गेला हे आपले भाग्यच म्हटले पाहिजे, अशा शब्दांत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी रविवारी शाहू विचारांचा गौरव केला.
येथील राजर्षी शाहू मेमोरियल ट्रस्टतर्फे दिला जाणारा अत्यंत मानाचा ‘शाहू’ पुरस्कार पवार यांना श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. अध्यक्षस्थानी कोल्हापूरचे पालकमंत्री व सहकारमंत्री चंद्रकांत पाटील होते. पवार यांना पुरस्कार देताना सारे सभागृह उठून उभे राहिले व टाळ्यांच्या गजरातच या लोकनेत्याचा जनतेने गौरव केला. मानाचा कोल्हापुरी फेटा, स्मृतिचिन्ह, मानपत्र आणि १ लाख रुपये रोख असे या पुरस्काराचे स्वरूप होते.
सुमारे ४० मिनिटांच्या भाषणात पवार यांनी शाहू महाराजांच्या जीवनकार्याचा पटच श्रोत्यांसमोर उभा केला. ते म्हणाले, शाहूंनी १९०२मध्ये आपल्या संस्थानात मागासवर्गीयांना ५० टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला होता. आज शंभर वर्षांनंतरही आणि देशात लोकशाही असतानाही आपल्याला तसा निर्णय घेता आलेला नाही. दलित आणि उपेक्षित वर्गाचे कल्याण हेच त्यांच्या एकूण जीवितकार्याचे ध्येय राहिले, असे सांगून पवार म्हणाले, हा माणूस राजा होता, अवलिया होता की आणखी कोण होता, हे समजतच नाही. त्यांचे मन कधीच राजवाड्यात रमले नाही. गोरगरिबांच्या झोपडीतील खर्डा-भाकर यातच त्यांनी जास्त आनंद मानला.
त्यांनी जो विचार जोपासला, प्रशासकीय पद्धती राबवली, ती अभ्यासली तर त्यामध्ये देशातील आजच्या सर्व प्रश्नांची उत्तरे आपल्याला नक्की सापडतील, असेही पवार यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
राजर्र्षी शाहूंनी जे मांडले तेच पवार जगले, अशा शब्दांत चंद्रकांत पाटील यांनी पवार यांचा गौरव केला. मंत्री पाटील म्हणाले, काही व्यक्ती पुरस्कारांची उंची वाढवतात, तसेच आज या पुरस्काराचे झाले आहे. देशातील साखर उद्योग मोठा करण्याचे श्रेय हे पवार यांनाच जाते. काँग्रेसच्या काळात शेतकऱ्यांना जी कर्जमुक्ती झाली त्याचे सारे श्रेय पवार यांनाच जाते. राजकारणात त्यांनी भूमिका घेतल्या तरी त्याच्या तळाशी सामान्य माणसाचे हितच राहिले.
राजर्षी शाहू महाराज व पवार यांच्या कार्यामध्ये अनेक ठिकाणी साम्य असलेले पैलू दिसतात. अशा व्यक्तीला हा पुरस्कार दिला जात आहे याचा विशेष आनंद असल्याचे श्रीमंत शाहू महाराज यांनी सांगितले.
पुरस्काराची रक्कम रयत शिक्षण संस्थेला
शरद पवार यांनी पुरस्काराच्या एक लाखाच्या रकमेत पवार ट्रस्टचे आणखी चार लाख रुपये घालून ही रक्कम रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अनिल पाटील यांच्याकडे सुपुर्द केली व ‘रयत’च्या येथील शाहू कॉलेजला ही रक्कम द्यावी, अशी सूचना पवार यांनी केली.