रिपाइंला हवेत आता हॉटेलमध्ये कांदेपोहे
By Admin | Updated: May 15, 2015 02:18 IST2015-05-15T02:18:12+5:302015-05-15T02:18:12+5:30
वडापाव आणि गोमांसापाठोपाठ आता कांदापोहे राजकीय पक्षांच्या अजेंड्यावर दाखल झाले आहेत. राज्य शासनाच्या गोवंश हत्याबंदीला

रिपाइंला हवेत आता हॉटेलमध्ये कांदेपोहे
मुंबई : वडापाव आणि गोमांसापाठोपाठ आता कांदापोहे राजकीय पक्षांच्या अजेंड्यावर दाखल झाले आहेत. राज्य शासनाच्या गोवंश हत्याबंदीला विरोध करणाऱ्या रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाने हॉटेलांमध्ये कांदेपोहे मिळायला हवेत यासाठी बाह्या सरसावल्या आहेत. पंजाबी, दाक्षिणात्य खाद्यपदार्थांसोबत हॉटेलांमध्ये मराठी खाद्यपदार्थ म्हणून कांदेपोह्यांचा समावेश करावा, असे आवाहन रिपाइंने सर्व हॉटेलमालकांना केले आहे.
मुंबईसह राज्यात दरवर्षी लाखो पर्यटक येत असतात. मात्र काही अपवाद वगळता कोठेच मराठी खाद्यपदार्थ उपलब्ध होत नाहीत. यासाठी पक्षाच्या वतीने सर्व हॉटेलमालकांना आवाहन-पत्रे पाठविण्यात आल्याचे रिपाइंचे उपाध्यक्ष विवेक पंडित यांनी सांगितले.
ग्राहकांकडून मागणी नसते त्यामुळे कांदापोह्यांसारखे पदार्थ ठेवले जात नाहीत, असा दावा काही हॉटेलवाल्यांकडून केला जातो. मात्र, हा दावा फसवा आहे. पर्यटक आणि ग्राहकांना कांदेपाहे वा अन्य पदार्थांचा पर्यायच दिला नाही, तर कळणार कसे? पर्यटकांना पर्याय दिल्यास चव तयार होईल आणि आपोआप मागणी होईल, असा दावा पंडित यांनी केला.
खाजगीच नाही, तर राज्य शासनाच्या उपाहारगृहांमध्येही मराठी खाद्यपदार्थ मिळत नाहीत. याबाबत लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून शासकीय कार्यक्रम आणि सभारंभांमध्ये राज्याचे पारंपरिक खाद्यपदार्थ पुरविण्याचा आग्रह केला जाणार आहे. तसेच हॉटेल मॅनेजमेंटच्या महाविद्यालयांमध्ये पोह्यांचा समावेश करण्याबाबतही आवाहन करण्यात येईल, असे पंडित यांनी सांगितले. (प्रतिनिधी)