विक्रमगडमध्ये शेतीची कामे जोरात
By Admin | Updated: June 27, 2016 02:48 IST2016-06-27T02:48:00+5:302016-06-27T02:48:00+5:30
विक्रमगड तालुक्यातील शेतीची मशागतीची कामे पूर्ण करुन शेतकरी नांगरणी व लगोलग पेरणीच्या कामाला लागला आहे.

विक्रमगडमध्ये शेतीची कामे जोरात
विक्रमगड : जिल्हयात सर्वत्र पावसाची दमदार सुरुवात झालीआहे़ त्यानुसार विक्रमगड तालुक्यातील शेतीची मशागतीची कामे पूर्ण करुन शेतकरी नांगरणी व लगोलग पेरणीच्या कामाला लागला आहे. तालुक्यात आतपर्यंत सरासरी २६.५५ मि़मी़ पावसाची नोंद करण्यांत आल्याचे तहसिल कार्यालयाने सांगितले.
तालुक्यात एकुण ८६ गावपाडयांत ७५५७ हेक्टर क्षेत्रामध्ये मोठया स्वरुपात भात पिक घेतले जाते़ त्यासाठी सुधारीत भात वाणांमध्ये अती हळव्या गटात कर्जत-१८४, रत्नागिरी-२४, हळव्या गटात रत्ना, रत्नागिरी-१, रत्नागिरी-७११,कर्जत-३,कर्जत-४,कर्जत-७,एमटीयू-१०१०,रत्नागिरी-५, निमगरवा गट जया, पालघर-१, कर्जत-५ एमटीयू-१००१, कर्जत-६,
एच एम टी सोना, पुसा बासमती-१,इंद्रायणी, गरवा गट कर्जत-२,कर्जत-८,सुवर्णा(एमटीयू-७०२९), मसुरी, सांबा मसुरी(बीपीटी-५२०४),श्रीराम,संकरीत वाण पुसा आर एच-१०,संकरित मंगला,संकरित कल्याणी,संकरित सहयाद्री-२,संकरित सहयाद्री-४,संकरित सहयाद्री,संकरित सहयाद्री-३ याप्रमाणे सुधारीत भातांच्या बियाणांची आवक वाढली आहे़ पारंपारिक बियाणांचा वापर न करता मोठया प्रमाणात कंपन्यांनी तयार केलेल्या या भात बियाणांचा वापर होउ लागला आहे़ खताचीही मागणी वाढली आहे़ मान्सूनवर अवलंबून राहाणारा शेतकरी भात या एकाच पिकावर लक्ष केंद्रित करुन उत्पादन काढत असून या वर्षी पंचायत समिती कृषी विभागाने मागणी नुसार भात बियाणे वेळेत उपलब्ध करुन दिली जात आहेत. परंतु यंदाही भात बियाणे व खतांच्या किमतीही वाढल्याने शेती करणे शेतकऱ्यांना मोठे जिकिरीचे होत आहे़
>मोखाड्यातही संततधार सुरू
मोखाडा : शनिवारी दुपारी सुरू झालेल्या पावसाने रात्रभर मोखाडा व सभोवतालच्या परिसरामध्ये संततधार चालू ठेवल्याने बळीराजा सुखावला आहे. आठवडाभर राज्यांच्या अनेक भागात ठाण मांडुन बसलेल्या वरु ण राजाने अखेर पालघर जिल्ह्यातील जव्हार, मोखाडा आदी तालुका भरात दमदार हजेरी लावली. दीड-दोन आठवड्याभरापूर्वी धुळीवर पेरणी केलेल्या नाचणी, वरई आदी पिकांना या पावसाने जीवनदान मिळालेले आहे.तसेच दिवसभरांच्या संततधारेमुळे शेतकऱ्याने भात, तूर, उडीद या पिकांच्या पेरणीच्या कामांना जोमाने सुरवात केली आहे.तर महिन्यातील चौथा शनिवार व रविवारी पाऊस सुरू असल्याने अनेकांनी पिकनिकचा आनंद घेतला. रविवार पासून बळीराजा पेरणीच्या कामात मग्न असल्याचे सर्वत्र दिसत होते. (वार्ताहर)