रब्बीच्या मशागतीनंतर खरीपाच्या पीक नुकसानाचे पंचनामे
By Admin | Updated: November 4, 2016 02:08 IST2016-11-04T02:08:39+5:302016-11-04T02:08:39+5:30
पीक नुकसानाचे पंचनामे वरातीमागून घोडे हाकण्याचा प्रकार ठरत आहे.

रब्बीच्या मशागतीनंतर खरीपाच्या पीक नुकसानाचे पंचनामे
संतोष येलकर
अकोला, दि. ३- परतीच्या पावसामुळे जिल्हय़ातील पीक नुकसानाचे सर्वेक्षण प्रशासनामार्फत करण्यात येत आहे; मात्र रब्बी पेरण्यांसाठी शेतकर्यांनी शेतीच्या मशागतीची कामे केल्यानंतर पीक नुकसानाचे पंचनामे सुरू करण्यात आल्याने, नुकसानाचे पंचनामे कसे करणार, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळे शासनाच्या आदेशानुसार विलंबाने सुरू करण्यात आलेले पीक नुकसानाचे पंचनामे वरातीमागून घोडे हाकण्याचा प्रकार ठरत आहे.
जिल्हय़ात गत ४ ऑक्टोबरपर्यंंत परतीचा पाऊस जोरदार बरसला. या पावसामुळे काढणीला आलेल्या आणि कापणी झालेल्या सोयाबीन पिकाचे प्रचंड नुकसान झाले. तसेच उडीद व कापूस पिकाचे नुकसान झाले. हातातोंडाशी आलेला घास परतीच्या पावसाने पळविल्याने, गत दोन वर्षांंच्या दुष्काळी परिस्थितीनंतर जिल्हय़ातील शेतकरी पुन्हा हवालदिल झाला. या पृष्ठभूमीवर यावर्षीच्या खरीप हंगामात गत जुलै ते ऑक्टोबर या कालावधीत अतवृष्टी, वादळी वारे व पुरामुळे शेती पिके व फळ पिकांच्या नुकसानाचे सर्वेक्षण करून अहवाल सादर करण्याचे निर्देश कृषी आयुक्तालयाच्या कृषी संचालक (विस्तार शिक्षण)मार्फत १९ ऑक्टोबर रोजीच्या पत्रानुसार जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाले. त्यानुषंगाने गत जुलै ते ऑक्टोबर या कालावधीत जिल्हय़ातील सोयाबीन, कापूस, तूर, मूग व उडीद या पिकांच्या नुकसानासह खरबडून गेलेल्या शेतजमिनीचे सर्वेक्षण करून संयुक्त स्वाक्षरीचे अहवाल जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकडे सादर करण्याचा आदेश जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी जिल्हय़ातील तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी आणि पंचायत समितीच्या गटविकास अधिकार्यांना (बीडीओ) दिला. त्यानुसार गत पाच दिवसांपासून जिल्हय़ातील पीक नुकसानाचे पंचनामे करण्याचे काम तलाठी, कृषी सहायक व ग्रामसेवकांच्या संयुक्त पथकांमार्फत सुरू करण्यात आले; मात्र यावर्षीच्या रब्बी हंगामातील पेरण्या गत १५ दिवसांपासून सुरू झाल्या. रब्बी पिकांच्या पेरणीसाठी शेतकर्यांनी शेतीच्या मशागतीची कामे पूर्ण करण्यात आली. शेतीच्या मशागतीची कामे पूर्ण झाल्यानंतर आणि रब्बी पिकांच्या पेरण्या सुरू झाल्यानंतर सुरू करण्यात आलेल्या पीक नुकसानाच्या सर्वेक्षणात नुकसान झालेल्या शेतातील पीक नुकसानाची माहिती सर्वेक्षण करणार्या पथकांकडून कशी नोंदविली जाणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. पीक नुकसानाच्या सर्वेक्षणाचा आदेश शासनामार्फत विलंबाने प्राप्त झाल्याने, सुरू करण्यात आलेले पीक नुकसानाचे पंचनामे वरातीमागून घोडे हाकण्याचा प्रकार ठरणार आहे.
पिकांचे नुकसान दिसणार कसे?
रब्बी हंगामातील पेरणीसाठी शेतीच्या मशागतीची कामे पूर्ण करण्यात आली. तसेच रब्बीच्या पेरण्याही सुरू झाल्या. त्यानंतर सुरू करण्यात आलेल्या पीक नुकसानाच्या पंचनाम्यात सोयाबीन, मूग व उडीद पिकांचे नुकसान दिसणार कसे आणि यासंबंधीची माहिती सर्वेक्षण करणार्या पथकांकडून कशी नोंदविण्यात येणार, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.