मुख्यमंत्र्यांची पाठ फिरताच प्रशासनाचे ‘स्टॉल’ उठले
By Admin | Updated: September 3, 2015 01:02 IST2015-09-03T01:02:38+5:302015-09-03T01:02:38+5:30
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी जिल्ह्यातील हाडोंग्री येथील चारा छावणीला भेट दिली. जिल्हा प्रशासनाने विविध योजनांची माहिती देणाऱ्या ‘स्टॉल’ची उभारणी केली होती.

मुख्यमंत्र्यांची पाठ फिरताच प्रशासनाचे ‘स्टॉल’ उठले
उस्मानाबाद : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी जिल्ह्यातील हाडोंग्री येथील चारा छावणीला भेट दिली. जिल्हा प्रशासनाने विविध योजनांची माहिती देणाऱ्या ‘स्टॉल’ची उभारणी केली होती. मात्र मुख्यमंत्र्यांची पाठ फिरताच अवघ्या २० मिनिटांत प्रशासनाने स्टॉल हटविले.
मुख्यमंत्र्यांनी विविध भागांना भेटी देऊन दुष्काळाची पाहणी केली तसेच शेतकऱ्यांशी संवाद साधला. हाडोंग्री येथे उभारण्यात आलेल्या चारा छावणीलाही त्यांनी भेट दिली. मुख्यमंत्री येणार असल्याने छावणीच्या ठिकाणी प्रशासनाने शासकीय योजनांची माहिती देणाऱ्या सुमारे ११ ते १२ स्टॉलची उभारणी केली होती. कृषी विभाग, पंचायत समिती, गटशिक्षण अधिकारी कार्यालय, दुय्यम निबंधक, सह निबंधक, पशुधन विकास कार्यालय, तालुका आरोग्य विभाग, महिला व बालकल्याण विभागासह इतर स्टॉलचा त्यात समावेश होता.
मुख्यमंत्री छावणीस्थळी आल्यानंतर स्टॉलवर शेतकऱ्यांनी मोठी गर्दी केली होती. मात्र ते परंडा तालुक्याकडे रवाना होताच २० मिनीटांतच संबंधित विभागांनी स्टॉल हटविले. काही पत्रकारांनी याबाबत विचारणा सुरू केल्यानंतर प्रशासनाने पुन्हा स्टॉल उभारण्याची लगबग केली. जागजी येथे महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्या दौऱ्यावेळी तसेच राज्यपाल सी. विद्यासागर राव हे उस्मानाबाद तालुक्यातील वडगाव येथे दुष्काळी पाहणीसाठी आले होते. त्यावेळीही असाच प्रकार घडला
होता. (प्रतिनिधी)