अखेर आश्रयदात्याचे सांडलेले रक्त व्यर्थ!
By Admin | Updated: June 23, 2014 01:18 IST2014-06-23T01:18:35+5:302014-06-23T01:18:35+5:30
भरन्यायालयात साक्षीदाराच्या पिंजऱ्यात साक्ष देताना खुद्द मृताची पत्नी आणि मुलगीही फितूर झाल्याने रात्रंदिवस काबाडकष्ट करून कुटुंबाचे पालन करणाऱ्या एका दुर्दैवी आश्रयदात्याचे सांडलेले रक्त

अखेर आश्रयदात्याचे सांडलेले रक्त व्यर्थ!
पत्नी व मुलगीही झाली फितूर : गोळी झाडणारा संशयाचा लाभ मिळून निर्दोष
राहुल अवसरे - नागपूर
भरन्यायालयात साक्षीदाराच्या पिंजऱ्यात साक्ष देताना खुद्द मृताची पत्नी आणि मुलगीही फितूर झाल्याने रात्रंदिवस काबाडकष्ट करून कुटुंबाचे पालन करणाऱ्या एका दुर्दैवी आश्रयदात्याचे सांडलेले रक्त व्यर्थ ठरले.
खापरखेडा हद्दीतील सिल्लेवाडा वेकोलि कॅन्टीनसमोर एका पहारेदाराची देशीकट्ट्यातून गोळी झाडून हत्या करणाऱ्या आरोपीची सबळ पुराव्याअभावी संशयाचा लाभ देऊन अतिरिक्त सत्र न्यायाधीश अशोक धामेचा यांच्या न्यायालयाने निर्दोष सुटका केली.
रामकृष्णा देवराव मून (४५) रा. सिल्लेवाडा हवामहल, असे मृताचे नाव होते. भागीरथ रामस्वरूप खरग्याल (२७) रा. खापरखेडा, असे आरोपीचे नाव आहे.
२७ नोव्हेंबर २०१२ च्या रात्री ९ ते २८ नोव्हेंबरच्या सकाळी ७ वाजताच्या दरम्यान खुनाची घटना घडली होती. या खटल्याची पार्श्वभूमी अशी, रामकृष्णा हा आधी खाण कामगार होता. मिरगीचा आजार जडल्याने त्याला सिल्लेवाडा वेकोलि कॅन्टीन येथे ‘वॉचमन’चे काम देण्यात आले होते. पत्नी, १९ व १७ वर्षांच्या दोन मुली आणि १२ वर्षांचा मुलगा, असे हे कुटुंब. तो एकटाच या कुटुंबाचा भार वाहत होता. एक मुलगी बी. कॉम. प्रथम वर्षाला तर दुसरी अकराव्या वर्गात शिकायची. मुलगाही आठव्या वर्गात शिकायचा. लहान मुलीचे तिच्या एका मैत्रिणीमार्फत भागीरथसोबत प्रेमसंबंध प्रस्थापित झाले होते. भागीरथ हा विवाहित असतानाही त्याने या मुलीपासून ही बाब दडवून ठेवली होतो. खुनाच्या घटनेच्या पाच-सहा महिन्याआधीच त्याने आपल्या पत्नीला कोलकाता येथील माहेरी पाठवून दिले होते. भागीरथ हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा आहे. त्याच्याविरुद्ध मौदा, रामटेक, तुमसर येथे दरोडा आणि जबरीचोरीचे गुन्हे दाखल आहेत. रामकृष्णाला आपल्या मुलीच्या प्रेमसंबंधाबाबत समजताच त्याने भागीरथ याला घरी येण्यास सक्त मनाई केली होती. मुलीलाही त्याने ताकीद दिली होती. वडिलांचा विरोध झुगारून तिचे प्रेमसंबंध सुरूच होते. २७ नोव्हेंबर २०१२ रोजी भागीरथ याने लग्नासाठी या मुलीला कोराडी देवी मंदिरात नेले होते. परंतु तेथील पंडितने वडिलांशिवाय लग्न लावण्यास नकार दिला होता. त्यामुळे त्याने या मुलीला गायमुख मंदिरात नेऊन आपल्या मित्रांच्या साक्षीने तिच्याशी विवाह केला होता.