विधान परिषदेचे कामकाज स्थगित
By Admin | Updated: March 29, 2016 01:37 IST2016-03-29T01:37:11+5:302016-03-29T01:37:11+5:30
नांदेड येथील शेतकऱ्याने मंत्रालयासमोर केलेली आत्महत्या, चवदार तळ्यावरील जलपूजन आणि फर्ग्यूसन कॉलेजमधील राडा अशा तीन विषयांवरून सोमवारी विरोधकांनी विधान परिषदेत सरकारची

विधान परिषदेचे कामकाज स्थगित
मुंबई : नांदेड येथील शेतकऱ्याने मंत्रालयासमोर केलेली आत्महत्या, चवदार तळ्यावरील जलपूजन आणि फर्ग्यूसन कॉलेजमधील राडा अशा तीन विषयांवरून सोमवारी विरोधकांनी विधान परिषदेत सरकारची कोंडी केली. त्यामुळे एकूण चार वेळा सभागृह तहकूब करावे लागले. या गदारोळातच विनियोजन विधेयक मंजूर करण्यात आले आणि सभापतींनी दिवसभरासाठी सभागृहाचे कामकाज स्थगित केले. नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील माधव कदम या शेतकऱ्याने खरीप हंगामातील कापसाचे दुष्काळी अनुदान मिळत नसल्यामुळे होळी सणाच्या दिवशी मंत्रालयासमोर विष घेतले. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असतानाच शनिवारी त्याचा मृत्यू झाला. या घटनेचे विधान परिषदेत तीव्र पडसाद उमटले. प्रश्नोत्तराच्या तासाला विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी या आत्महत्येच्याप्रकरणी स्थगन प्रस्तावाद्वारे चर्चेची मागणी केली. एका शेतकऱ्याने मंत्रालयासमोर आपले जीवन संपवले ही अत्यंत गंभीर घटना असून कारागृहातील किंवा कोठडीतील आत्महत्यांवर सभागृहात चर्चा होते. परंतु शेतक-यांच्या आत्महत्येवर चर्चा होऊ नये ही दुर्दैवी बाब असल्याचा आरोप केला. काँग्रेसचे गटनेते शरद रणपिसे म्हणाले की शेतक-यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी कर्जमाफी हाच एकमेव उपाय आहे. शेकापचे जयंत पाटील म्हणाले की शेतक-याला अनुदान दिले नाही म्हणून त्याने आत्महत्या केली असेल तर संबंधित अधिका-यांना जबाबदार धरून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली. यावेळी विरोधकांनी घोषणाबाजी करत गोंधळ घातल्यामुळे सभापतींनी सभागृहाचे कामकाज तहकूब केले. त्या शेतकऱ्याला मदत दिली होती - खडसे आत्महत्या केलेल्या त्या शेतक-याच्या बँक खात्यावर ४ हजार ६२४ रुपये मदत जमा केले आहेत. तसेच अन्न सुरक्षा योजनेचा लाभही त्याला देण्यात आला होता. तरीदेखील या शेतक-याने महिन्याभरापूर्वी आत्महत्येचा प्रयत्न केला होता. तसेच शेतक-याला कापसाची मदत देण्यात आलेली नसल्याचे मदत व पुर्नवसन मंत्री एकनाथ खडसे यांनी सांगितले.