मुख्यालयात येणाऱ्या शिक्षकांवर कारवाई
By Admin | Updated: July 11, 2017 00:39 IST2017-07-11T00:39:18+5:302017-07-11T00:39:18+5:30
ग्रामीण भागातील प्राथमिक शाळेतील शिक्षकांची वैयक्तिक कामे ही आपल्या तालुका पातळीवर गटशिक्षणाधिकाऱ्यांनी करावी.

मुख्यालयात येणाऱ्या शिक्षकांवर कारवाई
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : ग्रामीण भागातील प्राथमिक शाळेतील शिक्षकांची वैयक्तिक कामे ही आपल्या तालुका पातळीवर गटशिक्षणाधिकाऱ्यांनी करावी. या कामांसाठी कोणताही शिक्षक यापुढे पंचायत समिती अािण जिल्हा परिषदेच्या मुख्यालयात येणार नाही. जर कोणताही शिक्षक शाळेच्या वेळेत पंचायत समिती अथवा जिल्हा परिषदेच्या मुख्यालयात आला, तर त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा शिक्षण समिती सभापती विवेक वळसे-पाटील यांनी दिला आहे.
अनेक शिक्षक हे शाळेच्या वेळेत पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या मुख्यालयात येतात, अशा तक्रारी समितीच्या अनेक सदस्यांनी या बैठकीत केल्या. गावोगावचे अनेक शिक्षक हे स्थानिक पातळीवर राजकारणात सक्रिय आहेत, ते विद्यार्थ्यांना शिकविण्याचे काम सोडून बऱ्याच वेळा पदाधिकाऱ्यांच्या पुढे पुढे करतात. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीकडे त्यांचे दुर्लक्ष होते़ सध्या जिल्हा परिषदेच्या शाळांपुढे खासगी शाळांचे आव्हान उभे आहे. त्यामुळे शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीकडे लक्ष द्यावे, त्यांनी मुख्यालयात येऊ नये, असे वळसे पाटील यांनी सांगितले़
>विविध विषयांवर रंगली सभासदांची चर्चा
जिल्हा परिषदेच्या सभागृहात शिक्षण समितीची बैठक सोमवारी पार पडली. या वेळी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. या बैठकीत जिल्हा परिषदेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांचे गणवेश, पाठ्यपुस्तके, शिक्षकांच्या रिक्त जागा, शालेय पोषण आहार, शैक्षणिक गुणवत्ता अभियान, वरिष्ठ वेतनश्रेणी, वैद्यकीय बिले या विषयांवर चर्चा केली़
जिल्ह्यात ५१२ शिक्षक आठवडाभरात रुजू होणार
जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये ९२३ जागा रिक्तआहेत़ आंतरजिल्ह्यातून ५१२ शिक्षक रुजू होणार आहेत़ पुणे जिल्ह्यातून इतर जिल्ह्यात ८२ शिक्षण बाहेर गेले आहेत़ त्यामुळे रिक्त जागा राहण्याचा प्रश्न बऱ्यापैकी मार्गी लागणार आहे़
तरीही चारशे जागांच्या आसपास
या जागा रिक्त राहतील़ जिल्हा परिषदेच्या सर्व शाळा डिजिटल करण्याचा मानस असून, याबाबत येत्या महिनाभरात निर्णय घेतला जाणार असल्याचेही उपाध्यक्ष विवेक वळसे-पाटील यांनी याप्रसंगी सांगितले़
दोन-तीन शाळांचे एकत्रिकरण करून समायोजन करणार
शिक्षण समितीच्या सदस्यांनी आपापल्या मतदार संघात असलेल्या समस्या मांडल्या. विविध शैक्षणिक योजनांवर चर्चा करण्यात आली़ शालेय पोषणआहार आणि गणवेश वाटप या योजना प्रभावीपणे राबविण्याचे आवाहन, वळसे पाटील यांनी केले़
तसेच, एकाच परिसरात सुरू असलेल्या दोन-तीन शाळांचे एकत्रीकरण करून समायोजन करण्याचा प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे पाठवावा, अशा सूचना गटशिक्षणाधिकाऱ्यांना करण्यात आल्या़ शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी गटशिक्षणाधिकाऱ्यांनी कालबद्ध कार्यक्रम तयार करून त्याचा आढावा घेण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले़