मनोहर कुंभेजकर, मुंबई: दहिसर (केतकीपाडा), गोरेगाव (फिल्मसिटी ) व कांदिवली (दामूनगर) येथील व्यावसायिक बांधकाम तोडण्याबाबतच्या हालचाली वनविभागाकडून सुरू केल्या आहे. या संदर्भात उत्तर मुंबईचे माजी खासदार गोपाळ शेट्टी यांनी राज्याचे वन मंत्री गणेश नाईक यांना दूरध्वनी वरून संपर्क साधला. तसेच सदर तोडकाम हे सर्वोच्च न्यायालयाच्या १९९८ च्या आदेशाच्या संभाव्य विरोधात असल्याचे त्यांच्या निदर्शनास आणून दिले. मंत्री महोदयांनी ही बाब ऐकून घेत संयुक्त बैठक घेण्याचे आश्वासन दिले आणि तोडकामाची तारीख आठ दिवसांसाठी पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे हजारो झोपडीधारकांना दिलासा मिळाला.
गरीब, श्रमिक, झोपडपट्टीवासीयांसाठी आपल्या मनात असलेली सहवेदना आणि तातडीने कृती करण्याची आपली हातोटी हीच आपली खरी ओळख आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात आपण गेली कित्येक दशके एक प्रामाणिक, अनुभवी आणि जनसामान्यांचा आवाज बनून उभे राहिलात हे नुसते उल्लेखनीय नाही, तर प्रेरणादायी आहे असे शेट्टी यांनी मंत्री गणेश नाईक यांना लिहिलेल्या पत्रात नमूद केले आहे. पण त्याही आधी आपण दाखवलेली तत्परता हेच खरे जनसेवेचे उदाहरण आहे असे त्यांनी पत्रात म्हटले आहे.
आज केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी व राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्व असताना, गोरगरिबांच्या जीवनात आमूलाग्र सुधारणा घडवून आणण्याचे काम सुरू आहे. पण दुर्दैवाने काही मोजक्या स्वार्थी घटकांकडून न्यायालयाच्या माध्यमातून चुकीची माहिती देऊन गोरगरिबांना वेठीस धरण्याचा प्रयत्न होत आहे. अशा वेळी आपल्यासारख्या अनुभवसंपन्न, सजग आणि सामाजिक भान असलेल्या मंत्र्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरते असे त्यांनी नमूद केले. या संदर्भात मी स्वतः मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करीत आहे. न्यायालयाकडून योग्य निर्णय मिळेल अशी अपेक्षा आहे, असेही ते शेवटी म्हणाले.