बोलण्यापेक्षा कृती करा !
By Admin | Updated: July 21, 2014 00:59 IST2014-07-21T00:59:43+5:302014-07-21T00:59:43+5:30
जनतेने विश्वासाने तुमच्या हाती कें द्रातील सत्ता दिली आहे. आता चर्चेपेक्षा कार्यमग्न व्हा, बोलण्यापेक्षा विकास कामे दाखवा, असा सल्ला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी

बोलण्यापेक्षा कृती करा !
सरसंघचालकांचा सल्ला : समन्वय बैठकीचा समारोप
नागपूर : जनतेने विश्वासाने तुमच्या हाती कें द्रातील सत्ता दिली आहे. आता चर्चेपेक्षा कार्यमग्न व्हा, बोलण्यापेक्षा विकास कामे दाखवा, असा सल्ला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी रविवारी दिला.
रेशीमबाग येथील स्मृती मंदिर परिसरातील संघाचे प्रांत प्रचारक व संघ परिवारातील विविध संघटनांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या दोन दिवसीय समन्वय बैठकीच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते. यावेळी केंद्रीय परिवहन व ग्रामविकास मंत्री नितीन गडकरी, कोळसा व ऊर्जा मंत्री पीयूष गोयल,पर्यावरण व वन मंत्री प्रकाश जावडेकर, भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेतील विरोधीपक्षनेते विनोद तावडे, भाजयुमोच्या प्रदेशाध्यक्ष पंकजा पालवे-मुंडे, माजी प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांच्यासह राज्यातील विविध संघटनांचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
दोन दिवसाच्या समन्वय बैठकीत प्रामुख्याने विकास व संघटना बळकट करण्यावर भर देण्यात आला. संघ परिवाराशी संबंधित २० ते २५ संघटना आहेत. यातील काही संघटना कमकुवत आहे. त्यांच्या अडचणी सोडवा, त्यांना पाठबळ द्या. यासाठी आपसात समन्वय व संपर्क वाढवा, असे आवाहन भागवत यांनी केले.
लोकसभा निवडणुकीप्रमाणे महाराष्ट्रातील सत्ता परिवर्तनावर विश्वास ठेवून विधानसभा निवडणुकीत सकारात्मक दृष्टिक ोन ठेवा, आघाडी व युवा मोर्चानेही वातावरण निर्मितीसाठी पुढाकार घ्यावा, महिलांवरील अत्याचाराच्या विरोधात लढा उभारण्यात पदाधिकाऱ्यांनी भर द्यावा. पक्ष संघटना मजबूत नसलेल्या मतदारसंघात कोणती व्यूहरचना करावी, कोणत्या मतदार संघावर लक्ष केंद्रित करावे, यावर चर्चा करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.(प्रतिनिधी)
विकासाची गुरुदक्षिणा द्या!
लोकांनी विश्वास टाकल्याने केंद्रात सत्ता आली. हा विश्वास सार्थ ठरविण्यासाठी कृती करून आता विकासाची गुरुदक्षिणा द्या, असे आवाहन मोहन भागवत यांनी केले.
डोंगर चमकला पाहिजे
देशापुढे वीजसंकट उभे ठाकले आहे. यातून मार्ग काढण्यासाठी केंद्र शासनाने प्रयत्नांची पराकाष्ठा करावी असा संदेश देताना दुर्गम भागातील डोंगर चमकला पाहिजे, असा उपदेश भागवत यांनी केंद्र्रीय ऊर्जा मंत्री पीयूष गोयल यांना केला.