आरोपी सुटले तर उपोषण करेन
By Admin | Updated: September 8, 2016 02:56 IST2016-09-08T02:56:28+5:302016-09-08T02:56:28+5:30
कोणीही उठतो आणि वर्दीवर हात टाकतो. पोलिसांच्या वर्दीला काही किंमत आहे की नाही? जर उद्या माझ्या मुलाचे काही बरेवाईट झाले

आरोपी सुटले तर उपोषण करेन
आकाश गायकवाड, डोंबिवली
कोणीही उठतो आणि वर्दीवर हात टाकतो. पोलिसांच्या वर्दीला काही किंमत आहे की नाही? जर उद्या माझ्या मुलाचे काही बरेवाईट झाले, तर त्याला सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहील, अशा शब्दांत कल्याणमधील पोलीस उपनिरीक्षक नितीन डगळे यांची आई सत्यभामा डगळे यांनी आपल्या संतापाला ‘लोकमत’कडे वाट मोकळी करून दिली. आपल्या मुलावर हात उगारणाऱ्यांना राजकीय दबावापोटी कठोर शिक्षा झाली नाही, तर आमरण उपोषण करण्याचा इशाराही या माऊलीने दिला आहे.
मंगळवारी रात्री अत्यंत किरकोळ वादावादीनंतर नितीन यांना कल्याण पूर्वेतील जरीमरी मित्र मंडळाच्या चार कार्यकर्त्यांनी विसर्जन तलावात बुडवून मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना घडल्यानंतर पहाटे नितीन घरी परतले, पण त्यांनी घरातील कोणालाही काही सांगितले नाही. सकाळी जेव्हा त्या हल्ल्याची चित्रफीत सर्व वाहिन्यांवर दिसू लागली, तेव्हा नितीनची विचारपूस करण्यासाठी शेजारीपाजारी येऊ लागले, फोन वाजू लागले, तेव्हा आमचा मुलगा कोणत्या प्रसंगातून काल गेला, ते आम्हाला कळले, असे सत्यभामा म्हणाल्या. कायद्याचा वचक राहिला नाही. कोणीही उठतो आणि पोलिसांवर हल्ले करतो. पोलीस हे जनतेचे रक्षक आहेत. जर त्यांच्यावरच असे जीवघेणे हल्ले झाले, तर सामान्य नागरिकांनी न्याय कोणाकडे मागायचा, असा संतप्त सवालही त्यांनी केला.
मुलावर ओढवलेला प्रसंग पाहिला आणि अलीकडेच मारहाणीत मरण पावलेले पोलीस हवालदार विलास शिंदे यांची आठवण झाली. माझा मुलगा नितीन वेळीच त्या हल्लेखोरांच्या तावडीतून सुटला नसता तर कदाचित आमच्यावर मोठा दु:खद प्रसंग ओढवला असता, असेही त्या म्हणाल्या.
वडील धोंडू डगळे म्हणाले की, राजकीय दबाव आणि हस्तक्षेपाने अशा प्रकरणांमधील आरोपी शेफारले आहेत. आमचा वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांवर विश्वास असून माझ्या मुलाला योग्य न्याय मिळेल, असे वाटते. त्या हल्ल्यातून वाचल्यानंतर नितीन यांनी सर्वप्रथम आपल्या घरी फोन करून पत्नीकडे मुलाची चौकशी केली. आई हृदयविकाराने आजारी असल्याने तिला काही कळणार नाही, याची खबरदारी घेण्याची सूचना केली. त्यानंतर, ते पोलीस स्टेशनमध्ये गेले. ही माहिती देऊन नितीन यांची पत्नी नम्रता म्हणाल्या की,पोलिसांवरील हल्ले वाढले आहेत, त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी कोणाची? आज माझ्या नवऱ्याला काही झाले असते तर माझी दोन मुले अर्णव आणि मानस यांचे संगोपन मी कसे केले असते?