भ्रष्टाचाऱ्यांवर कारवाईसाठी ‘एसीबी’ला सर्वतोपरी मदत
By Admin | Updated: December 30, 2014 01:29 IST2014-12-30T01:29:02+5:302014-12-30T01:29:02+5:30
भ्रष्ट अधिकारी, पदाधिकाऱ्यांवर तातडीने कारवाई होण्यासाठी राज्य सरकार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला (एसीबी) आवश्यक मदत करेल, अशी ग्वाही उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी सोमवारी येथे दिली.

भ्रष्टाचाऱ्यांवर कारवाईसाठी ‘एसीबी’ला सर्वतोपरी मदत
कोल्हापूर : भ्रष्ट अधिकारी, पदाधिकाऱ्यांवर तातडीने कारवाई होण्यासाठी राज्य सरकार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला (एसीबी) आवश्यक मदत करेल, अशी ग्वाही उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी सोमवारी येथे दिली.
उद्योजकांबरोबरच्या बैठकीसाठी देसाई येथे आले असताना पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, मुंबई महापालिकेत सर्वाधिक भ्रष्टाचार असल्याचे वक्तव्य एसीबीचे महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी केले आहे. त्यावर शिवसेनेची भूमिका विचारली असता देसाई म्हणाले, महापालिकेतील भ्रष्टाचाऱ्यांवर तातडीने कारवाई करण्यात यावी. भ्रष्टाचाराने सर्वसामान्य त्रस्त झाले आहेत. आतापर्यंत सत्तेत असणारेच भ्रष्टाचार करत होते. त्यामुळे भ्रष्ट अधिकारी, पदाधिकारी, कर्मचाऱ्यांवर कारवाई होत नव्हती. मात्र, आता सत्तापालट झाले आहे. आम्ही स्वच्छ कारभारासाठी जनतेशी बांधील आहोत. राज्यात पाच लाख कोटींची गुंतवणूक आणण्याचे आमचे स्वप्न आहे. त्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. या गुंतवणुकीतून २० लाख नवीन रोजगार उपलब्ध होणार आहेत. औद्योगिक क्षेत्रात आघाडीवर असलेल्या कोल्हापूरला यामध्ये निश्चित मोठा वाटा दिला जाईल. येथील उद्योजक अन्य राज्यांत स्थलांतरित होऊ नयेत, यादृष्टीने त्यांना आवश्यक सुविधा, योजना देण्याचा प्रयत्न केला जाईल, असे देसाई म्हणाले. (प्रतिनिधी)