एपीएमसीजवळ गांजा विक्रीच्या अड्ड्यावर धाड
By Admin | Updated: August 22, 2016 02:41 IST2016-08-22T02:41:17+5:302016-08-22T02:41:17+5:30
एपीएमसीच्या धान्य मार्केटसमोरील झोपडपट्टीत अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या गांजा विक्रीच्या अड्ड्यावर पोलिसांनी धाड टाकली आहे.

एपीएमसीजवळ गांजा विक्रीच्या अड्ड्यावर धाड
नवी मुंबई : एपीएमसीच्या धान्य मार्केटसमोरील झोपडपट्टीत अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या गांजा विक्रीच्या अड्ड्यावर पोलिसांनी धाड टाकली आहे. तब्बल ६ किलो १०० ग्रॅम गांजा हस्तगत केला असून दोन आरोपींना अटक केली आहे.
अटक केलेल्या आरोपींमध्ये मोमीन मोफीस खान व बादशहा इफाजल शेख या दोघांचा समावेश आहे. दोघेही आरोपी कळवा येथील शांतीनगर मोफतलाल इंडस्ट्री, जाकीर किराणा स्टोअर्सजवळील झोपडपट्टीतील आहेत. नवी मुंबईमध्ये खुलेआम गांजा विक्री होत असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने स्टिंग आॅपरेशनच्या माध्यमातून उघडकीस आणले होते. या स्टिंग आॅपरेशनची दखल घेवून अमली पदार्थ विरोधी पथक व पोलीस स्टेशन स्तरावर शोध मोहीम सुरू केली आहे. एपीएमसीजवळील युनियन बँकेच्या कंपाऊंडजवळच्या झोपडपट्टीमध्ये १९ आॅगस्टला रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास दोन जण गांजा विकत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र गलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी गांजा विक्रीच्या अड्ड्यावर धाड टाकली. तेथे विक्रीसाठी आणलेला ६ किलो १०० ग्रॅम गांजा आढळून आला. बाजारभावाप्रमाणे त्याची किंमत ६१ हजार रूपये होत आहे. पोलिसांनी तत्काळ दोन्ही आरोपींना ताब्यात घेवून त्यांच्यावर अमली पदार्थ विरोधी कायदा १९८८ चे कलम ८ (क) २०, २२ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
गत एक महिन्यामध्ये पोलिसांनी नेरूळमधून एका आरोपीला अटक केली आहे. एपीएमसीमध्ये गांजा ओढणारा, विकणाऱ्या व गांजाचे रोपे लावणाऱ्यांना अटक केली आहे. यापूर्वी गांजा व इतर अमली पदार्थ विक्री प्रकरणी अटक केलेल्या आरोपींनाही ताब्यात घेवून त्यांची चौकशी केली आहे. पोलिसांनी एक महिन्यात टाकलेल्या धाडीमध्ये पहिल्यांदा १ किलो गांजा सापडला आहे. या गुन्ह्यामध्ये अजून किती जणांचा समावेश आहे, आरोपींना गांजा कोण पुरवत होते याची माहितीही पोलीस घेत आहेत. धान्य मार्केटसमोरील या झोपडपट्टीमध्ये कराळे नावाची महिला व तिच्या कुटुंबातील इतर सदस्य गांजाची विक्री करत होते. यामुळे एकावर कारवाई झाली तर दुसरे तो व्यवसाय करू लागतात अशी माहिती सूत्रांनी दिली. आतापर्यंत हा अड्डा कधीच बंद झाला नाही. या कुटुंबात जवळपास २४ जण आहेत. पोलिसांच्या धाडसत्रामुळे हा अड्डा पहिल्यांदा बंद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
>राजेंद्र गलांडेंचा धडाका
एपीएमसी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र गलांडे यांनी अमली पदार्थ विक्रेत्यांविरोधात जोरदार मोहीम सुरू केली आहे.
यापूर्वीही गलांडे यांची नियुक्ती असणाऱ्या पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रामध्ये अवैध व्यवसायांविरोधात धडक कारवाई केली होती.
एपीएमसीमध्येही त्यांनी केलेल्या कारवाईमुळे या परिसरातील सर्व अवैध व्यवसाय बंद होतील अशी शक्यता वर्तविली जात आहे.