आधार जोडणी मोहीम बारगळणार !
By Admin | Updated: October 1, 2015 02:55 IST2015-10-01T02:55:31+5:302015-10-01T02:55:31+5:30
गोरगरीब जनतेचे परस्पर धान्य लाटणाऱ्यांचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी सुरू झालेल्या आधार जोडणी मोहिमेला राज्यात थंड प्रतिसाद मिळत आहे़

आधार जोडणी मोहीम बारगळणार !
अण्णा नवथर , अहमदनगर
गोरगरीब जनतेचे परस्पर धान्य लाटणाऱ्यांचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी सुरू झालेल्या आधार जोडणी मोहिमेला राज्यात थंड प्रतिसाद मिळत आहे़ सरकारी अधिकाऱ्यांच्या उदासीनतेमुळे ही मोहीम बारगळण्याची चिन्हे असून, धान्य वितरणातील गळतीची कीड रोखणे त्यामुळे अवघड होणार आहे. राज्यात अडीच कोटी आधार नोंदणी प्राप्त झाली असून, ७ कोटी १६ हजार ६८४ एवढे लक्ष्य गाठणे अवघड होणार आहे.
अन्नधान्याच्या पूर्वीच्या योजना गुंडाळत सरकारने सर्वांसाठी अन्नसुरक्षा योजना आणली़ त्यामुळे गोरगरिबांना अत्यल्प दरात धान्य मिळू लागले़ मात्र योजनेत धनदांडग्यांनीही घुसखोरी केली़ त्यामुळे लाभार्थींची संख्या वाढून धान्य वितरण यंत्रणाही कोलमडण्याची स्थिती आहे.
आधार जोडणीमुळे गॅस सिलिंडरमधील गळती काहीशी दूर झाल्याने सरकारने शिधापत्रिकाधारकांसाठीही आधार जोडणीची मोहीम सुरू केली़ अन्न सुरक्षा योजनेंतर्गत धान्यपुरवठा केल्या जाणाऱ्या शिधापत्रिकाधारकांचेही आधार कार्ड जोडणीची मोहीम सुरू करण्यात आली़ शिधापत्रिकाधारकांच्या आधार जोडणीची जबाबदारी गावोगावच्या स्वस्त धान्य दुकानदारांवर सोपविण्यात आली आहे़ दुकानदारांना त्यासाठी आॅगस्टपर्यंत मुदत देण्यात आली. मुदत संपून एक महिना उलटला़, मात्र जोडणीच्या टक्केवारीत सुधारणा झाली नाही़
सरकारने दिलेल्या मुदतीत अवघ्या ३८ टक्के शिधापत्रिकांची आधार जोडणी करण्यात आली़ उर्वरितांचे आधार क्रमांक अद्याप प्राप्त झालेले नाहीत़