राज्याला मिळाले ९.३0 कोटी!
By Admin | Updated: February 16, 2016 01:04 IST2016-02-16T01:04:08+5:302016-02-16T01:04:08+5:30
रब्बी पीक विमा रकमेत अमरावती विभागाचा वाटा ३.९९ टक्के तर विभागात अकोला जिल्हा आघाडीवर.

राज्याला मिळाले ९.३0 कोटी!
राजरत्न सिरसाट/अकोला: राष्ट्रीय पीक विमा योजना शेतकर्यांसाठी कवचकुंडलाची भूमिका बजावत असून, मागील १६ वर्षांत रब्बी पीक विम्याची ९३0 कोटी ७३ लाख १८ हजार रुपये नुकसान भरपाई राज्यातील शेतकर्यांना मिळाली असून,अमरावती विभागाचा यात ३.९९ टक्के वाटा आहे. या विभागात अकोला जिल्हा आघाडीवर आहे.
पावसाची अनिश्चितता,नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकर्यांचे होणारे पिकांचे नुकसान टाळण्यासाठी सन १९९९ मध्ये सर्वप्रथम रब्बी पिकासाठी पीक विमा योजना सुरू केली आहे. त्यानंतर २000 साली खरीप पीक विमा योजना सुरू करण्यात आली. या पीक विमा योजनेंतर्गत शेतकर्यांना पिकाचा विमा काढावा लागतो. मागील १६ वर्षात राज्यात २४ लाख ७५ हजार हेक्टर क्षेत्रावरील रब्बी पिकांचा विमा काढण्यात आला होता. याकरिता २१४ कोटी ५५ लाख ६७ हजार विमा हप्ता शेतकर्यांनी भरला होता. या विमा हप्त्यापोटी राज्यातील २९ लाख ८८ हजार शेतकर्यांना ९३0 कोटी ७३ लाख १८ हजार रुपये नुकसान भरपाई मिळाली आहे. या रब्बी विमा योजनेचा लाभ विदर्भातील १८ लाख ५८ हजार शेतकर्यांना झाला आहे. ११ लाख ६३ हजार हेक्टरचा विमा शेतकर्यांनी काढला होता.
अमरावती विभागातील शेतकर्यांनी १२ कोटी ६८ लाख ८२ हजार रुपये विमा हप्ता भरला होता. या विभागाला ३७ कोटी ११ लाख ३0 हजार रुपये नुकसान भरपाई मिळाली आहे.
अकोला जिल्हा आघाडीवर
नैसर्गिक आपत्ती बघता अकोला जिल्हय़ातील शेतकर्यांनी राष्ट्रीय पीक विमा योजनेवर भर दिला असून,रब्बी पीक विमा योजना सुरू झाली तेव्हापासून आतापर्यंत या जिल्हय़ातील एक लाख ३७ हजार शेतकर्यांनी ९ कोटी ४९ लाख २५ हजार रुपये रब्बी पीक विमा हप्ता भरला होता, या शेतकर्यांना १९९९ ते २0१५ पर्यंत २५ कोटी ५४ लाख ५५ हजार रुपये नुकसान भरपाई मिळाली आहे. ही टक्केवारी २.७५ म्हणजे अमरावती विभागातील पाच जिल्हय़ात सर्वाधिक आहे.