मुंबई : पावसाळ्यामध्ये मुंबईकरांचे आरोग्य निरोगी राहावे म्हणून मुंबई महानगरपालिका विविध उपाययोजना राबवित आहे. एप्रिल आणि मे या दोन महिन्यांमध्ये मुंबई शहरामध्ये मलेरियाचे ९०० हून अधिक रुग्ण आढळले असून, पाच महिन्यांमध्ये २ हजार १०० मलेरियाचे रुग्ण आढळल्याचे संसर्गजन्य आजार विभागाच्या प्रमुख डॉ. मंगला गोमारे यांनी सांगितले. मुंबई शहरामध्ये गेल्या काही वर्षांमध्ये पावसाला सुरुवात झाली की, मलेरिया, डेंग्यूसारख्या आजारांची आकडेवारी चढती असते. पावसाळा सुरू होण्यापूर्वीच एप्रिल महिन्यामध्ये ५२५ तर मे महिन्यामध्ये ४०० मलेरियाचे रुग्ण आढळून आले आहेत. मात्र, या कालावधीतील गेल्या वर्षीच्या मलेरियाच्या रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत यंदा रुग्ण कमी असल्याचे डॉ. गोमारे यांनी सांगितले. जानेवारी ते मे २०१४ या कालावधीमध्ये मलेरियाचे एकूण २ हजार १०० रुग्ण आढळून आले आहेत. मलेरिया हा पावसाळी आजार नाही. वर्षभरामध्ये मलेरियाचे रुग्ण आढळतच असतात. पावसाळ्यासाठी कर्मचार्यांना प्रशिक्षण देण्याची सुरुवात ७ एप्रिल आरोग्य दिनापासूनच करण्यात आली आहे. पावसाळ्यामध्ये जनजागृतीचे कार्यक्रम राबवले जाणार आहेत. पावसाळ्याला सुरुवात झाली की, दरवर्षीप्रमाणे आठवड्याचे पावसाळी कॅम्प सुरू करण्यात येणार आहेत. सर्व प्रकारची तयारी झाली असल्याचे डॉ. गोमारे यांनी सांगितले. एप्रिल आणि मे महिन्यांमध्ये उन्हाळा जास्त वाढलेला होता. यामुळे मुंबईकर आजारी पडण्याचे प्रमाण वाढले होते.
दोन महिन्यांत मुंबईत मलेरियाचे ९०० रुग्ण
By admin | Updated: May 29, 2014 03:21 IST