कृष्णजन्माष्टमीची ८६ वर्षांची परंपरा
By Admin | Updated: August 25, 2016 02:57 IST2016-08-25T02:57:16+5:302016-08-25T02:57:16+5:30
गेल्या ८६ वर्षांपासून कृष्णजन्माष्टमीचा उत्सव राऊत कुटुंबीय गुण्यागोविंदाने आणि मोठ्या उत्साहात साजरा करतात.

कृष्णजन्माष्टमीची ८६ वर्षांची परंपरा
नेरळ : गेल्या ८६ वर्षांपासून कृष्णजन्माष्टमीचा उत्सव राऊत कुटुंबीय गुण्यागोविंदाने आणि मोठ्या उत्साहात साजरा करतात. आज या उत्सवात त्यांची ४ थी पिढी सहभागी झाली आहे. कर्जत तालुक्यातील भिसेगावातील निशिकांत राऊत यांच्या घरी दरवर्षी हा उत्सव कृष्णजन्माष्टमीच्या दिवशी साजरा केला जातो. या उत्सवात गावातील व परिसरातील बाळगोपाळ, तरु ण मंडळी, महिलावर्ग व ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्याने हजेरी लावतात.
गोपाळकाला उत्सवाबाबत गावातील बुजुर्ग मंडळींच्या माहितीनुसार आणि राऊत कुटुंबीयांच्या घरातील सुशीला महादू राऊत यांच्या म्हणण्यानुसार, त्या या घरात सून म्हणून येण्यापूर्वीपासून हा उत्सव होत असल्याचे सांगतात. त्यांचे सासरे गोपाळ वाळकू राऊत हे गणेशोत्सवात आपल्या घरगुती गणपतीचे विसर्जन उल्हास नदीच्या पात्रात केल्यानंतर मूठभर वाळू काढण्यासाठी नदीच्या पात्रात हात टाकला असता त्यांच्या हातात एक सुंदर अशी सुबक बाळकृष्णाची मूर्ती सापडली. त्यांनी ती मूर्ती घरी आणून देवघरात ठेवून पूजाविधी केला. पुढे जन्माष्टमीचा उत्सव सुरु झाला. आज या उत्सवाला ८६ वर्षे पूर्ण होत असल्याचे चंद्रकांत राऊत यांनी सांगितले.
जन्माष्टमीच्यादिवशी नदीच्या पात्रात सापडलेल्या कृष्णमूर्तीचा पूजाविधी केला जातो व रात्री १२ वाजता ती मूर्ती पाळण्यात ठेवून पाळणा म्हटला जातो. गावातील सर्व मंडळी उत्सवाला हजेरी लावतात. दिवसभर भजन, हरिपाठ व रात्री आरती झाल्यावर कृष्णपाळणा म्हटला जातो. यावेळी दहीपोह्यांची उधळण करून सुंठवड्याचा प्रसाद वाटला जातो. या उत्सवाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे गावातील व परिसरातील नवोदित दांपत्य अपत्य लाभासाठी बाळकृष्णाचे दर्शन घेतल्यानंतर पाळणा हलविण्याची प्रथा आजही कायम आहे. त्यामुळे या उत्सवात बाळगोपाळ कृष्णाला पाळण्यात ठेवल्यानंतर नवोदित दांपत्य पाळणा हलविण्यासाठी गर्दी करतात. उत्सवाच्या दुसऱ्या दिवशी मानाची दहीहंडी फोडली जाते. (वार्ताहर)
>पाळणा हलविण्याची प्रथा
उत्सवाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे गावातील व परिसरातील नवोदित दांपत्य अपत्य लाभासाठी बाळकृष्णाचे दर्शन घेतल्यानंतर पाळणा हलविण्याची प्रथा आजही कायम आहे. त्यामुळे या उत्सवात बाळगोपाळ कृष्णाला पाळण्यात ठेवल्यानंतर नवोदित दांपत्य पाळणा हलविण्यासाठी गर्दी करतात. उत्सवाच्या दुसऱ्या दिवशी मानाची दहीहंडी फोडल्यानंतर गावातील बाळगोपाळ उर्वरित हंड्या फोडतात.