८५ लाचखोरांना अटक
By Admin | Updated: June 3, 2015 03:25 IST2015-06-03T03:25:34+5:302015-06-03T03:25:34+5:30
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने चालू वर्षात केलेल्या कारवाईत ८५ जणांना रंगेहाथ पकडले. यामध्ये साधारणत: ५० टक्क्याहून अधिक लाचखोरांचे वय ४६ पेक्षा अधिक

८५ लाचखोरांना अटक
ठाणे : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने चालू वर्षात केलेल्या कारवाईत ८५ जणांना रंगेहाथ पकडले. यामध्ये साधारणत: ५० टक्क्याहून अधिक लाचखोरांचे वय ४६ पेक्षा अधिक आहे. तर २५ वर्षांखालील लाचखोरांची संख्या फक्त दोन असून, महसूल विभागापेक्षा लाचखोरीत गृह विभाग (पोलीस) आघाडीवर पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. यावरून शासकीय सेवेत काम करणाऱ्या लोकसेवकांच्या वाढत्या वयाबरोबर लाच स्वीकारणाऱ्यांचे प्रमाणही वाढल्याने ही एक समस्याच निर्माण होत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
ठाणे लाचलुचपत विभागाचे कार्यक्षेत्र हे ठाणे जिल्हा व शहरापासून पालघर जिल्हा, नवी मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग असे पसरले आहे. जानेवारी ते मे महिन्यात या विभागाकडे आलेल्या तक्रारीवरून शासननिर्मित ३९ विभागांतील ८५ लोकसेवकांसह खासगी लोकांना जेरबंद केले आहे. यामध्ये ४६ वर्षांवरील ४३ जणांना, २५ ते ३५ वर्षांमध्ये २० तसेच ३६ ते ४५ वर्षांमध्ये २० आणि २५ वर्षांखाली वयोगटातील २ जण जेरबंद करण्यात आले आहेत.
१ जानेवारी ते ३१ मेदरम्यान राज्यात महसूल विभागातील १६०, तर त्यापाठोपाठ १४२ गृृह विभागातील (पोलीस) लोकसेवकांना लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले आहे. याचदरम्यान ठाणे लाचलुचपत विभागाने केलेल्या कारवाईत ८३ जणांना अटक झाली. त्यामध्ये गृह विभाग आघाडीवर आहे. या विभागातील १७ जणांना लाच घेताना पकडले आहे, तर त्यापाठोपाठ महसूल विभाग आणि जिल्हा परिषदमध्ये प्रत्येकी ११-११ जणांना भ्रष्टाचाराप्रकरणी अटक झाली आहे. तर राज्य उत्पादन शुल्क विभागातील ८, वन विभाग ५, कामगार विभाग आणि महावितरण विभागातील प्रत्येकी ४, महानगरपालिका, आरटीओ, नगरपालिका ३, भूमी अभिलेख २, आदिवासी विभाग २, न्याय आणि विधी विभाग २, आरोग्य, सार्वजनिक बांधकाम, नगर परिषद, कृषी उत्पन्न बाजार समिती आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरण या विभागात प्रत्येकी एकाला लाच स्वीकारताना अटक झाली आहे. (प्रतिनिधी)