राज्य सरकारची शेतकऱ्यांना ७५० कोटींची मदत
By Admin | Updated: September 5, 2015 01:31 IST2015-09-05T01:31:58+5:302015-09-05T01:31:58+5:30
मराठवाडा व विदर्भातील बीड, उस्मानाबाद, अकोला, वाशिम, अमरावती, वर्धा जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्याकरिता नाबार्ड आणि महाराष्ट्र राज्य सहकारी बँक यांच्या सहकार्याने

राज्य सरकारची शेतकऱ्यांना ७५० कोटींची मदत
मुंबई : मराठवाडा व विदर्भातील बीड, उस्मानाबाद, अकोला, वाशिम, अमरावती, वर्धा जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्याकरिता नाबार्ड आणि महाराष्ट्र राज्य सहकारी बँक यांच्या सहकार्याने राज्य शासनाने ७५० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. पिण्याचे पाणी, चारा, रोजगार, दुबार पेरणी याकरिता ही रक्कम उपलब्ध करून दिली जाणार असल्याचे सहकार मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
दुष्काळामुळे कर्जबाजारीपणा, अन्नान्न दशा आणि हाताला रोजगार नाही, अशा भीषण परिस्थितीत बळीराजाला मदतीचा हात देऊन त्याला या संकटातून बाहेर काढण्याकरिता राज्य सरकारने नाबार्डचे सहकार्य घेण्याचे ठरवले आहे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून शेतकऱ्यांना लागेल तेवढा निधी शेती कामाकरिता उपलब्ध करून दिला जाणार आहे. या निधीतून शेतकरी कर्ज, चारा, बी-बियाणे यांची खरेदी करू शकणार आहे, असे पाटील यांनी सांगितले. (विशेष प्रतिनिधी)