अतिवृष्टीतील नुकसानग्रस्त रस्ते, साकवांसाठी ७५ कोटींची मागणी

By Admin | Updated: November 4, 2016 05:14 IST2016-11-04T05:14:42+5:302016-11-04T05:14:42+5:30

यंदाच्या अतिवृष्टीमुळे रत्नागिरी जिल्ह्यातील पाच तालुक्यांमध्ये ३०४ रस्त्यांचे नुकसान झाले

75 crore demand for damaged roads in the highway, for Saakwa | अतिवृष्टीतील नुकसानग्रस्त रस्ते, साकवांसाठी ७५ कोटींची मागणी

अतिवृष्टीतील नुकसानग्रस्त रस्ते, साकवांसाठी ७५ कोटींची मागणी


रत्नागिरी : यंदाच्या अतिवृष्टीमुळे रत्नागिरी जिल्ह्यातील पाच तालुक्यांमध्ये ३०४ रस्त्यांचे नुकसान झाले असून, तब्बल ३६ साकवांची पडझड झाली आहे. त्यांच्या दुरुस्तीसाठी ७४ कोटी ८२ लाख रुपये मागणीचा प्रस्ताव जिल्हा परिषद चिपळूण बांधकाम विभागाकडून शासनाला सादर करण्यात आला आहे. यापूर्वीही शासनाकडून रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी जिल्हा परिषदेने मागणी करुनही अपुरा निधी आल्याने अनेक रस्ते, साकव दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहे. त्यामुळे यंदा पावसाळ्यात नुकसानग्रस्त झालेल्या रस्ते, साकवांसाठी निधी मिळणार की नाही, अशी चर्चा परिषद भवनात सुरु आहे.
गेल्या दहा वर्षात यंदा पावसाचे प्रमाण जास्त होते. त्यामुळे पावसाळ्यात आर्थिक नुकसानीसह प्राणहानीही झाली होती. चिपळूण विभागातील चिपळूण, खेड, गुहागर, दापोली आणि मंडणगड या पाच तालुक्यांमध्ये पावसाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. नुकसानग्रस्त रस्ते, साकवांसाठी ७४ कोटी ८२ लाख रुपयांची अवश्यकता आहे. त्याबाबतचा प्रस्ताव तयार करुन चिपळूण बांधकाम विभागाने तो शासनाला सादर केला आहे. (वार्ताहर)
>कोट्यवधीची थकबाकी कायम
जिल्हा परिषदेच्या चिपळूण बांधकाम विभागाकडून जिल्ह्यात कोट्यवधी रुपयांची कामे करण्यात आली आहेत. मात्र, अद्यापही ठेकेदारांना या कामांची बिले न मिळाल्याने ते परिषद भवनाच्या पायऱ्या झिजवित आहेत. त्यामुळे अनेक ठेकेदारांसमोर आर्थिक प्रश्न निर्माण झाला आहे. शासनाकडून निधी न आल्याने ठेकेदारांची देणी देणार कुठून, असे अधिकाऱ्यांकडून सांगितले जात आहे.

Web Title: 75 crore demand for damaged roads in the highway, for Saakwa