जिल्ह्यात पेरण्या ७०%
By Admin | Updated: June 30, 2016 03:26 IST2016-06-30T03:26:06+5:302016-06-30T03:26:06+5:30
जिल्ह्यात समाधानकारक पाऊस पडला असून ७० टक्के क्षेत्रावरील पेरण्या पूर्ण झाल्या आहेत.

जिल्ह्यात पेरण्या ७०%
हितेन नाईक,
पालघर- जिल्ह्यात समाधानकारक पाऊस पडला असून ७० टक्के क्षेत्रावरील पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. शेतकऱ्यांनी आपापल्या शेतात खरीप पेरण्यांच्या कामाला सुरूवात केली आहे. जिल्ह्यातील लागवडी खालील एकूण १ लाख ७ हजार १३० हेक्टर क्षेत्र असून त्यामध्ये भातासाठी ४ हजार ९५३ हेक्टर, नागलीसाठी १ हजार २४०.२१ हेक्टर,वरईसाठी ९८०.५० हेक्टर,तूर साठी ४६१.८० हेक्टर तर उडीद साठी २४५.५७ हेक्टर खरीप पेरणी पिकासाठी वापरण्यात येणार आहे. गत वर्षी जिल्ह्यात १.७४ लाख मेट्रिक टन भाताचे उत्पादन झाले, या वर्षी २.०९ लाख मेट्रिक टन भाताच्या उत्पादनाचे लक्ष्य ठेवण्यात आल्याची माहिती जिल्हा कृषी विभागाने दिली आहे.
निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी शेती उत्पादनबाबत सतत नुकसानीच्या गर्तेत सापडला असून कमी पर्जन्यमान, अवकाळी पावसाचा फटका बसल्यामुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. या नैसर्गिक संकटाचा सामना करीत असतांना हाती आलेल्या उत्पादित मालालाही योग्य हमी भाव मिळत नसल्याने शेतकरी कर्जाच्या विळख्यात सापडला आहे.या वर्षी हवामान खात्याने समाधानकारक पावसाची श्यक्यता वर्तविल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या असल्या तरी यंदा मान्सून १३ दिवस उशिराने दाखल झाल्याने पेरणीची कामे थोडया विलंबाने शेतकऱ्यांनी हाती घेतली आहेत.
शेतकऱ्यांनी बियाणे खरेदी करताना व ती पेरताना घ्यावयाच्या काळजी बाबत उपाय योजना सुचविल्या असून पिशवीतील बियाणे काढताना घ्यावयाच्या काळजी बरोबरच सदोष बियाण्यांची निवड, न करणे त्याची आनुवंशिक गुणवत्ता ओळखणे, वातावरणातील बदल लक्षात घेऊन बियाणांची निवड करणे, इ.उपाय सुचवले आहेत. सदोष बियाणे आढळल्यास घ्यावयाच्या काळजीमध्ये बियाणे उगवल्यास त्याची उगवण कमी असल्याचे आढळल्यास तात्काळ खरेदी केलेल्या बियाणांचे नमुने पंचायत समतिच्या किंवा जिल्हा कृषी अधिकाऱ्यांना तपासणी करावयास सांगून पावत्यांसह तक्र ार करावी, विक्रेत्या उत्पादकावर बियाणे कायदा १९६६ कलम १९ नुसार कायदेशीर कारवाईची मागणी करावी,बियाणांची साठेबाजी,चढ्या भावाने विक्री होत असल्यास कृषी अधिकारी पंचायत समिती यांच्याकडे तक्रार करावी असे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे. (प्रतिनिधी)
पालघर जिल्ह्यातील पालघर,डहाणू,वाडा,वसई,विक्र मगड आणि जव्हार तालुक्यात भाताचे पीक घेतले जाते. हळवे, गरवे आणि निमगरवे इ, पद्धतीने लागवड केली जात असली तरी १) भाताच्या तुसाची राख (सिलिकॉन मिळण्यासाठी), २) चिखलणीवर हिरवळी खताचा वापर करणे(गिरीपुष्प), ३) नियंत्रित लागवड करणे ४) युरिया ब्रीकेटचा वापर अशा चारसूत्री लागवडीचा वापर केल्यास कमी खर्चात जास्त उत्पादन घेता येत असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी पवार यांनी दिली.
खरिपाच्या पेरणी अहवालानुसार पालघर जिल्ह्यातील...
वसई तालुक्यात भात लागवडी साठी १० हजार ६१३ हेक्टर सरासरी क्षेत्र असून त्या पैकी फक्त ५७२ हेक्टर क्षेत्रावर प्रत्यक्ष पेरणी केली जाते.नागली,वरई,उडीद ची लागवड या तालुक्यात केली जात नाही.
पालघर तालुक्यात सर्वाधिक १५ हजार ५१४ हेक्टेर क्षेत्रा पैकी १ हजार २३२ हेक्टर क्षेत्रावर प्रत्यक्ष पेरणी केली जाते. तर नागली, वरई, तूर, उडीद, मूग, भुईमूग, तील, खुरासनी इ, पिके अत्यल्प प्रमाणात घेतली जातात.
डहाणू तालुक्यात १४ हजार ११७ हेक्टर सरासरी क्षेत्र असून त्या पैकी ९१७ हेक्टर क्षेत्रावर प्रत्यक्ष भात पेरणी केली जात असून इतर पिके अत्यल्प प्रमाणात घेतली जात आहेत.
तलासरी तालुक्यात ७ हजार ४५७ हेक्टर सरासरी क्षेत्र असून ४५४ हेक्टर क्षेत्रावर प्रत्यक्ष भातपेरणी केली जाते.तर नागली, वरई, तूर, उडीद इ, पिकांची पेरणी ३० ते ४५ टक्के केली जाते.
वाडा तालुक्यात १२ हजार ४३८ हेक्टर सरासरी क्षेत्रा असून ७५० हेक्टर क्षेत्रावर भातपेरणी केली जाते.या भागात नागली हे पीकही मोठ्या प्रमाणात घेतले जाते. तर वरई, तूर, उडीद, मूग, भुईमूग, तिळ, खुरासनी इ, पिके हि घेतात.
विक्र मगड तालुक्यात ७ हजार २५५ हेक्टर भाताचे सरासरी क्षेत्र असून ४४८ हेक्टर क्षेत्रावर प्रत्यक्ष पेरणी केली जाते.या तालुक्यात नागली,वरई तूर, उडीद ही पिके घेतली जातात.जव्हार तालुक्यात ६ हजार ७६ हेक्टर भाताचे सरासरी क्षेत्र असून ४६० हेक्टर क्षेत्रात प्रत्यक्ष पेरणी केली जाते. ह्या तालुक्यातून नागलीचे मोठ्या प्रमाणात पीक घेतले जाते.तर इतर पिके व कडधान्य पिके ही घेतली जातात.मोखाडा तालुक्यात ८ हजार ९१८ हेक्टर भाताचे सरासरी क्षेत्र असून १२० हेक्टर क्षेत्रावर प्रत्यक्ष पेरणी केली जाते. ह्या तालुक्यात नागली पीक सह वरई, तूर,उडीद व कडधान्याचे पिक घेतात.