रेल्वे मार्गावर ७ दिवसांत ६६ जणांचा मृत्यू

By Admin | Updated: June 27, 2016 04:50 IST2016-06-27T04:50:34+5:302016-06-27T04:50:34+5:30

मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गावर अपघात सत्र सुरुच आहे. गेल्या सात दिवसांत तब्बल ६६ जणांचा मृत्यू झाल्याची बाब समोर आली आहे.

66 deaths in 7 days on the railway track | रेल्वे मार्गावर ७ दिवसांत ६६ जणांचा मृत्यू

रेल्वे मार्गावर ७ दिवसांत ६६ जणांचा मृत्यू


मुंबई : मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गावर अपघात सत्र सुरुच आहे. गेल्या सात दिवसांत तब्बल ६६ जणांचा मृत्यू झाल्याची बाब समोर आली आहे. या अपघातानंतर रेल्वे प्रशासनाकडून अपघात कमी करण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांवरच प्रश्न उपस्थित झाले आहेत.
लोकलमधून पडणे, रेल्वे रुळ ओलांडताना, ओव्हरहेड वायरचा शॉक लागणे इत्यादी कारणांमुळे प्रवाशांचे अपघात होतात. हे अपघात रोखण्यासाठी मध्य आणि पश्चिम रेल्वेकडून प्रयत्न केले जात आहेत. हे अपघात रोखण्यासाठी प्रवास करताना नियम मोडल्याचे सांगत रेल्वे सुरक्षा दलाकडूनही प्रवाशांवर कठोर कारवाई केली जाते. मात्र पुन्हा जैसे थेच परिस्थिती निर्माण होत आहे. गुरुवार, शुक्रवार आणि शनिवारी या तीन दिवसांतच एकूण ३३ जणांचे बळी गेले आहेत. तर गेल्या सहा महिन्यांत १ हजार ४७३ प्रवाशांचे बळी गेल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. डोंबिवलीकर भावेश नकाते या तरुणाचा काही महिन्यांपूर्वीच गर्दीमुळे लोकलमधून पडून मृत्यू झाला होता. त्या घटनेचा बराच गाजावाजा झाल्यानंतर रेल्वे मंत्र्यांच्या आदेशानंतर पश्चिम व मध्य रेल्वेवर लोकप्रतिनिधी, प्रवासी संघटना, रेल्वेचे अधिकारी यांच्या समित्या स्थापन करण्यात आल्या. अपघात रोखण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजना सूचवण्याचे काम या समितींवर होते. मात्र अपघात सत्र सुरुच असताना अजूनही ठोस अशा उपाययोजना करण्यात आलेल्या
नाहीत. (प्रतिनिधी)
>५६ जण जखमी
उपाययोजना केल्याचा दावा रेल्वेकडून सातत्याने केला जात असला तरी अपघात कमी झालेले नाहीत. गेल्या सात दिवसांत अपघातांची संख्या पाहिल्यास तब्बल ६६ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ५६ जण जखमी झाले आहेत.गेल्या आठवड्यातील शनिवारी १५ जणांचा तर त्याआधीच्या गुरुवारी १४ जणांचा मृत्यू झाला आहे.

Web Title: 66 deaths in 7 days on the railway track

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.