पहिल्या फेरीत ६,५०० प्रवेश
By Admin | Updated: July 23, 2014 00:53 IST2014-07-23T00:53:34+5:302014-07-23T00:53:34+5:30
बारावीच्या निकालाची टक्केवारी वाढल्यामुळे यंदा प्रवेश चांगल्या प्रमाणात होतील, ही महाविद्यालयांची अपेक्षा ‘कॅप’च्या (सेंट्रलाईज अॅडमिशन प्रोसेस) पहिल्या फेरीत तरी फोल ठरली आहे.

पहिल्या फेरीत ६,५०० प्रवेश
अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रिया : महाविद्यालयांची चिंता वाढली
नागपूर : बारावीच्या निकालाची टक्केवारी वाढल्यामुळे यंदा प्रवेश चांगल्या प्रमाणात होतील, ही महाविद्यालयांची अपेक्षा ‘कॅप’च्या (सेंट्रलाईज अॅडमिशन प्रोसेस) पहिल्या फेरीत तरी फोल ठरली आहे. पहिल्या फेरीत नागपूर विभागातील केवळ साडेसहा हजार विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. बहुतांश विद्यार्थ्यांनी मुंबई, पुणे तसेच बाहेरील महाविद्यालयांना प्राधान्य दिल्यामुळे, महाविद्यालयांच्या चिंतेत वाढ झाली आहे.
‘डीटीई’तर्फे (डायरेक्टोरेट आॅफ टेक्निकल एज्युकेशन) राबविण्यात येणाऱ्या अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेमध्ये सध्या ‘कॅप’ची दुसरी फेरी सुरू आहे. परंतु पहिल्या फेरीत महाविद्यालये ‘अलॉट’ होऊनदेखील अनेक विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेले नाही. निवडक आठ महाविद्यालये सोडली तर इतर ठिकाणी प्रवेशाचा दुष्काळच आहे. विभागातील काही महाविद्यालयांमध्ये तर एकही प्रवेश झाला नसल्याची माहिती ‘डीटीई’च्या सूत्रांनी दिली आहे. विभागातील ५७ महाविद्यालयांमध्ये २५,०५२ जागा आहेत. ‘आॅनलाईन’ प्रक्रियेत केवळ १७,१९६ म्हणजेच सुमारे ७० टक्के अर्ज दाखल झाले होते. पहिल्या फेरीत यापैकी जवळपास ६,५०० विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत; म्हणजे अजूनही ७४ टक्के जागा रिक्त आहेत.
अनेक विद्यार्थ्यांना आवडीचे महाविद्यालय न मिळाल्याने त्यांनी ‘अलॉट’ झालेल्या जागेवर प्रवेश घेतलेच नाही. दुसऱ्या फेरीकडून त्यांना मोठ्या प्रमाणात अपेक्षा आहेत, अशी माहिती ‘डीटीई’च्या सूत्रांनी दिली. (प्रतिनिधी)
विद्यापीठाची डागाळलेली प्रतिमा कारणीभूत
निवडक नावे सोडली तर नागपूर विभागातील अभियांत्रिकी महाविद्यालयांचा दर्जा ढासळतो आहे. त्यातच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाची छबीदेखील फारशी चांगली नाही. मागील दोन वर्षांपासून विद्यापीठात सुरू असलेले निरनिराळे वाद आणि गोंधळांमुळे प्रतिमा आणखी डागाळली आहे. शिवाय अभियांत्रिकीच्या मूल्यांकनाबाबत प्रश्न उपस्थित करण्यात येतात. त्यातून गेल्या दोन वर्षांत अनेकदा आंदोलनेदेखील झाली.
ही बाब लक्षात घेता अनेक विद्यार्थ्यांनी बाहेरील विद्यापीठात प्रवेश घेण्यासच प्राधान्य दिले व पर्यायाने विभागातील महाविद्यालयांना याचा फटका बसताना दिसतो आहे.