मिहान इंडियावर ५९.४० कोटी थकीत!
By Admin | Updated: January 30, 2015 00:59 IST2015-01-30T00:59:06+5:302015-01-30T00:59:06+5:30
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाचे संचालन करणाऱ्या मिहान इंडिया लिमिटेड या कंपनीवर भारतीय विमानतळ प्राधिकरणाचे (एएआय) ५९.४० कोटी रुपये थकीत असून

मिहान इंडियावर ५९.४० कोटी थकीत!
कंपनीतर्फे विमानतळाचे परिचालन : थकीत रकमेवर चिंता
नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाचे संचालन करणाऱ्या मिहान इंडिया लिमिटेड या कंपनीवर भारतीय विमानतळ प्राधिकरणाचे (एएआय) ५९.४० कोटी रुपये थकीत असून त्यात दिवसेंदिवस वाढ होत असल्याची अधिकृत माहिती आहे.
विमानतळाचे परिचालन सध्या मिहान इंडिया लिमिटेड (एमआयएल) ही कंपनी करीत आहे. यामध्ये एमएडीसीची (राज्य सरकार) ५१ टक्के तर एएआयची (केंद्र सरकार) ४९ टक्के भागीदारी आहे. आॅगस्ट २००९ मध्ये एमआयएल ही संयुक्त कंपनी स्थापन करण्यात आली. करारानुसार १२५ कर्मचारी मिहान इंडियामध्ये कार्यरत आहेत. याच कर्मचाऱ्यांमुळे एमआयएलची कामे सुरू असल्याचा प्राधिकरणाचा दावा आहे. या कर्मचाऱ्यांना मिहान इंडियाने पगार द्यावा, अशी तरतूद असतानाही प्राधिकरणातर्फे पगार देण्यात येतो. तसे पाहता कंपनीला विमानाचे लँडिंग व पार्किंग शुल्क, दुकानांचे भाडे, जाहिराती, बिल्डिंगचे भाडे, प्रति व्यक्ती २२५ रुपये प्रवासी सेवा शुल्क आणि अनेक मार्गाने उत्पन्न मिळते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर कंपनीला १ एप्रिल २०१३ ते ३१ मार्च २०१४ या काळात विमानाच्या लँडिंगद्वारे ९.६५ कोटी प्राप्त झाले. याशिवाय पार्किंगद्वारे ८.६५ लाख, पीएसएफद्वारे १३.५८ कोटी आणि जाहिरातीच्या अधिकाराद्वारे १.०८ कोटी रुपये मिळाले आहेत. चालू आर्थिक वर्षात यात दुपटीने वाढ होण्याची शक्यता आहे. ही रक्कम एमएडीसीकडे जमा होते. त्यानंतरही मिहान इंडियावर दिवसेंदिवस वाढणारी थकीत रक्कम ही चिंतेची बाब आहे. एएआय ही खासगी कंपनी असती तर ५९.४० कोटींची थकीत रक्कम मिहान इंडिया लिमिटेडकडून वसूल केली असती, असे सूत्रांनी सांगितले. (प्रतिनिधी)
एअर आशिया नागपुरात हब बनविणार
मलेशिया येथील एअर आशिया विमान कंपनी नागपुरात हब बनविण्याच्या तयारीत आहे. कंपनीने राज्य शासनाकडे जागेची मागणी करीत आहे. या संदर्भात चर्चा सुरू असल्याची माहिती आहे. सध्या कंपनी घरगुती उड्डाणाचे परिचालन चेन्नई येथून करीत आहे. बेंगळुरू-चेन्नई मार्गावर विमानसेवा सुरू आहे. नागपुरात हब झाल्याने हजारो युवकांना रोजगार उपलब्ध होईल.