पांढुर्ण्याच्या गोटमारीत ५०५ जखमी
By Admin | Updated: August 27, 2014 00:58 IST2014-08-27T00:58:32+5:302014-08-27T00:58:32+5:30
शेकडो वर्षांपासून पोळ्याच्या करीला मध्य प्रदेशातील पांढुर्णा येथे जांब नदीच्या पात्रात दंतकथेच्या आधारावर भरणाऱ्या पारंपरिक यात्रेत गोटमार केली जाते. या चित्तथरारक उत्सवात ५०५ जण जखमी झाले आहेत.

पांढुर्ण्याच्या गोटमारीत ५०५ जखमी
अनेकांना कायमचे अपंगत्व : अघोरी प्रथेपुढे प्रशासन हतबल
संजय खासबागे - वरुड
शेकडो वर्षांपासून पोळ्याच्या करीला मध्य प्रदेशातील पांढुर्णा येथे जांब नदीच्या पात्रात दंतकथेच्या आधारावर भरणाऱ्या पारंपरिक यात्रेत गोटमार केली जाते. या चित्तथरारक उत्सवात ५०५ जण जखमी झाले आहेत. अनेकांना कायमचे अपंगत्व येण्याची शक्यता आहे.
प्रेमकथेच्या आख्यायिकेवरुन अनेक वर्षांपासून सावरगाव आणि पांढुर्णा या नदीकिनारी असलेल्या दोन्ही गावांत पोळ्याच्या करीला गोटमार यात्रा भरते. प्रेमवीरांची ही कहाणी जपणाऱ्या दोन्ही गावातील नागरिक एकमेकांवर दगडफेक करतात. येथील गोटमार यात्रेत येणारा प्रत्येक माणूस एक दगड मारल्यानंतरच चंडी मातेचे दर्शन घेतो. यात्रेला सुरुवात होण्यापूर्वी भाविक सूर्योदयापूर्वी जांब नदीच्या पात्रात पळसाचे भले मोठे वृक्ष उभारून त्यावर झेंडा लावतात. वाजंत्रीच्या तालावर पूजाअर्चा झाली की, गोटमार यात्रेला सुरुवात होते. माध्यान्नानंतर या यात्रेला रंगत चढते. विदर्भासह मध्य प्रदेशातील कानाकोपऱ्यातून ही गोटामर यात्रा पाहण्यास भाविकांची मोठी गर्दी होेते. सावरगांव आणि पांढुर्ण्यांच्या भोळ्याभाबड्या नागरिकांमध्ये गोटमारीची धुमश्चक्री सुरु असताना गंभीर आणि किरकोळ दुखापती होणाऱ्यांकरिता मध्य प्रदेश आरोग्य विभागाच्या वतीने आरोग्य केंद्र स्थापन करण्यात येते. यावेळीही ते होते. तेव्हापासून येथे यांच्या स्मृतीचे प्रतीक म्हणून ही यात्रा दरवर्षी येथे भरते. सावरगाव आणि पांढुर्ण्यातील नागरिक तुफान दगडफेक करुन झेंडा आणण्याचा प्रयत्न करतात. अखेर दोन्ही गावांतील नागरिकांच्या तडजोडीने सूर्यास्तानंतर झेंडा चंडी देवीच्या मंदिरात आणून विधिवत पूजा केली जाते. केवळ धार्मिकतेच्या नावाखाली सुरु असलेल्या या अघोरी प्रथेमध्ये दरवर्षी शेकडो नागरिक जखमी होतात. यंदा या गोटमार यात्रेत ५०५ जण जखमी झाले आहेत. गोटमारीसाठी दगडाचा खच लावला जातो. येथे दगड आणण्यास प्रशासनाने मज्जाव केल्याने भाविक आणि पोलिसात तणाव झाला होता. श्रध्देतून निर्माण झालेल्या अंध्दश्रध्देमुळे अनेक महिला विधवा झाल्या. कुणी अंध, अपंग झाले. केवळ चंडी मातेच्या अंगाऱ्याने दुखापत बरी होते यावर येथील नागरिकांचा विश्वास आहे.
गोटामार यात्रेत गोटमारीत ६० वर्षात १२ लोकांचे बळी गेले. यामध्ये सन १९५५ मध्ये महोदव सांबारे, १९७८ मध्ये देवराव सकर्डे, १९७९ मध्ये लक्ष्मण तायवाडे, १९८७ मध्ये कोठीराम सांबारे, १९८९ मध्ये विठ्ठल तायवाडे, योगिराज चवरे, गोपाल चन्ने, सुधाकर हापसे, २००४ मध्ये रवि गायकी, २००५ मध्ये जनार्दन सांबारे, २००८ मध्ये गजानन घुग्गुसकर, २०११ मध्ये देवानंद वघाळे यांचा समावेश आहे.