रायगड किल्ल्याच्या संवर्धनासाठी ५०० कोटी
By Admin | Updated: July 2, 2016 03:21 IST2016-07-02T03:21:53+5:302016-07-02T03:21:53+5:30
विकास आराखड्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अंतिम मंजुरी दिली असल्याचे माहिती कोकण विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख यांनी रायगडावर दिली

रायगड किल्ल्याच्या संवर्धनासाठी ५०० कोटी
महाड : किल्ले रायगडाच्या संवर्धनासाठी ५०० कोटी रुपयांच्या विकास आराखड्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अंतिम मंजुरी दिली असल्याचे माहिती कोकण विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख यांनी रायगडावर दिली. छत्रपती शिवराय, राजमाता जिजाऊ आणि तमाम शिवभक्तांच्या मनातील रायगड घडवण्यासाठी शिवाजी महाराजांनी दिलेला हा अमूल्य ठेवा अखंडपणे जतन करण्यासाठी आपण प्रयत्न करू, अशी ग्वाही देखील देशमुख यांनी यावेळी दिली.
कृषी दिनानिमित्त रायगड किल्ल्यावर ११ हजार वृक्षलागवडीचा कार्यक्रम आज देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. त्यावेळी महाडचे आ. भरत गोगावले, मा. आ. माणिक जगताप, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप पांढरपट्टे, हिरवळ संस्थेचे अध्यक्ष किशोर धारिया, प्रांताधिकारी सुषमा सातपुते, तहसीलदार संदीप कदम, पं. स. सभापती दीप्ती फळसकर, कृषी अधिकारी साळवे यांच्यासह विविध विभागांचे शासकीय अधिकारी, सेवाभावी संस्थांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने या वृक्षारोपणासाठी सहभागी झाले होते.
रायगडावर २५ हजार झाडे लावण्याचा संकल्प असून, त्यापैकी आज ११ हजार झाडे लावण्यात आल्याचे देशमुख यांनी स्पष्ट केले. रायगडावर लावण्यात आलेल्या या झाडांचे संगोपन करण्याचे काम गडावरील धनगर समाजबांधवांना व परिसरातील ग्रामस्थांना दिले जाणार असून, त्यासाठी नरेगा योजनेतून त्यांना मोबदला दिला जाईल, असेही देशमुख यांनी सांगितले. आ. भरत गोगावले यांनी गड विकासाच्या कामात आयुक्त देशमुख यांनी पुढाकार घेतल्याने ५०० कोटींचा निधी मंजूर झाल्याचे सांगितले. महाराजांवरील श्रद्धेपोटी ग्रामविकास खात्याचे प्रधान सचिव पद नाकारून गडाचे संवर्धन करण्याच्या उद्देशाने प्रभाकर देशमुख यांनी कोकण आयुक्तपद स्वीकारले. त्याबद्दल ते अभिनंदनास पात्र असल्याचे माणिक जगताप यांनी सांगितले. (वार्ताहर)
२५,000 झाडे लावणार
रायगडावर २५ हजार झाडे लावण्याचा संकल्प असून, त्यापैकी आज ११ हजार झाडे लावण्यात आल्याचे देशमुख यांनी स्पष्ट केले. रायगडावर लावण्यात आलेल्या या झाडांचे संगोपन करण्याचे काम गडावरील धनगर समाजबांधवांना व परिसरातील ग्रामस्थांना दिले जाणार असून, त्यासाठी नरेगा योजनेतून त्यांना मोबदला दिला जाईल, असेही कोकण विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख यांनी सांगितले.