नाश्त्याच्या पोह्यातून ५० जणांना विषबाधा
By Admin | Updated: April 23, 2017 14:43 IST2017-04-23T14:43:19+5:302017-04-23T14:43:19+5:30
धार्मिक कार्यक्रमात नाश्त्यासाठी तयार केलेल्या पोह्यातून ५० जणांना विषबाधा झाल्याची घटना घडली आहे.

नाश्त्याच्या पोह्यातून ५० जणांना विषबाधा
ऑनलाइन लोकमत
मानवत (जि. परभणी ), दि. 23 - धार्मिक कार्यक्रमात नाश्त्यासाठी तयार केलेल्या पोह्यातून ५० जणांना विषबाधा झाल्याची घटना तालुक्यातील राजुरा येथे २२ एप्रिल रोजी १० वाजेच्या सुमारास घडली. या सर्व रुग्णांना परभणीच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रविवारी रुग्णांची प्रकृती ठणठणीत असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली.
मानवत तालुक्यातील राजुरा येथे अखंड हरिनाम सप्ताह सुरु असून या कार्यक्रमात सकाळी १० वाजेच्या सुमारास नाश्त्यासाठी पोहे देण्यात आले. त्यापैकी काही जणांना दुपारी ४ नंतर उलट्या आणि मळमळ सुरु झाली. लहान मुले आणि वयोवृद्ध नागरिकांना हा त्रास होत असल्याचे स्पष्ट झाले. शनिवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास दोन जीप आणि शासकीय रुग्णवाहिकेने रुग्णांना परभणी येथील जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यासाठी दाखल करण्यात आले. रविवारी या सर्वांची प्रकृती सुधारली असल्याचे सांगण्यात आले.
शाम खंडागळे, धनंजय निर्वळ, अतुल निर्वळ, कल्याण सुरवसे, मुंजा निर्वळ, अजय निर्वळ, बापु निर्वळ, दिलीप निर्वळ, सुनील निर्वळ, रवि निर्वळ, सुधीर निर्वळ, अर्जून निर्वळ, मुंजा खंडागळे यांना विषबाधा झाल्याची माहिती मिळाली आहे.
पोहे करण्यासाठी वापरलेली कढई गंजलेली असल्याने विषबाधा झाली असावी, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.