मुंबईत गेल्या २० वर्षांत कुत्रा चावल्याने झाला ४२९ लोकांचा मृत्यू
By Admin | Updated: March 10, 2016 12:30 IST2016-03-10T12:16:29+5:302016-03-10T12:30:27+5:30
मुंबईत गेल्या २० वर्षांत कुत्रा चावून ४२९ नागरिक मृत्यूमुखी पडले असून १३ लाख जखमी झाले आहेत.

मुंबईत गेल्या २० वर्षांत कुत्रा चावल्याने झाला ४२९ लोकांचा मृत्यू
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १० - मुंबईत गेल्या २० वर्षांत कुत्रा चावून ४२९ नागरिक मृत्यूमुखी पडले असून १३ लाखांहून अधिक जखमी झाले आहेत. मुंबई महापालिकेने सर्वोच्च न्यायालयात दिलेल्या माहितीनुसार, १९९४ पासून ते आत्तापर्यंत कुत्रा चावल्यामुळे रेबीज होऊन एकूण ४२९ लोकांचा मृत्यू झाला आहे तसेच याच काळात १३.१२ लाख लोक जखमी झाले आहेत.
न्या. दीपक मिश्रा व न्या. पी.सी.पंत यांच्या खंडपीठासमोर झालेल्या सुनावणीदरम्यान बीएमसीतर्फे बाजू मांडणारे अॅड. शेखर नाफडे यांनी याप्रकरणी ' भटक्या कुत्र्यांना मारण्यास विरोध करत न्यायालयात धाव घेणा-या एनजीओंवर' निशाणा साधला. या एनजीओ केवळ न्यायालयातच कार्यरत दिसतात, अशी टीका त्यांनी केली.
कुत्रा चावल्यामुळे मुंबईत दरवर्षी शेकडो नागरिक जखमी होतात, पण आम्ही जर त्या कुत्र्यांना हटवण्याचा प्रयत्न केला तर प्राणीप्रेमी याचा निषेध करत विरोध दर्शवतात. मात्र ही समस्या मूळापासून सोडवण्यासाठी ते काहीही पावलं उचलत नाहीत, असेही नाफडे यांनी नमूद केले.