३७ लाखांचे बनावट बियाणे जप्त
By Admin | Updated: June 20, 2014 00:56 IST2014-06-20T00:41:38+5:302014-06-20T00:56:11+5:30
बाजारातून खरेदी केलेले सोयाबीन साफ करून मध्य प्रदेशातील कंपनीच्या नावे कर्नाटकात विकण्यार्या टोळीला जिल्हा परिषद कृषी विभागाच्या पथकाने गुरुवारी पकडले.

३७ लाखांचे बनावट बियाणे जप्त
आकोट : आकोटच्या स्थानिक बाजारातून खरेदी केलेले सोयाबीन साफ करून मध्य प्रदेशातील कंपनीच्या नावे कर्नाटकात विकण्यार्या टोळीला जिल्हा परिषद कृषी विभागाच्या पथकाने गुरुवारी पकडले. या व्यापार्यांकडून ३७ लाख रुपये किमतीचे सोयाबीन बियाणे जप्त करण्यात आले आहे. दरम्यान, आकोट येथून ६४ टन सोयाबीन चार ट्रकद्वारे कर्नाटकच्या बाजारात पोहोचले आहे. कर्नाटक येथील व्यापारी बजरंग अग्रवाल याने आकोटच्या बाजारातून खरेदी केलेले सोयाबीन खरेदी करून आकोट-हिवरखेड मार्गावरील दुर्गा अँग्रो इंडस्ट्रिज येथे साफ करून इंडो अँग्री जेनेटिक्स सिड्स कंपनी देवास या मध्य प्रदेशातील ३0 किलोच्या थैल्यांमध्ये भरले जात होते. या थैल्यांवर देवासच्या कंपनीचा टॅगही लावण्यात येत होता. हे बियाणे येथून सरळ कर्नाटक राज्याच्या बाजारात विक्रीसाठी पाठविणे सुरू होते. या एका बॅगेची किंमत २७00 रुपये असल्याचे बॅगवर छापले आहे. आत्तापर्यंत अशा सोयाबीनचे चार ट्रक ६४ टन माल घेऊन कर्नाटकात पोचले आहेत. पाचवा ट्रक भरत असतानाच कृषी विभागाच्या भरारी पथकाने दुर्गा अँग्रो इंडस्ट्रिजवर छापा घातला असताना तेथे ४१४ क्विंटल सोयाबीन आढळून आले. याची किंमत ३७ लाख २९ हजार रुपये असल्याचे अधिकार्यांनी सांगितले. जि. प. अकोलाचे कृषी विकास अधिकारी उदय काथोडे, जिल्हा गुणवत्ता निरीक्षक शिरीष नानोटे व आकोट पं.स.चे कृषी अधिकारी अनिल राठोड यांनी ही कारवाई केली. या प्रकरणी दुर्गा अँग्रो इंडस्ट्रिजचे संचालक संजय नंदकिशोर अग्रवाल तथा कर्नाटकचा व्यापारी बजरंग अग्रवाल या दोघांना भरारी पथकाने ताब्यात घेतले. या प्रकरणी रीतसर पोलिस फिर्याद दाखल करून पुढील तपास होणार असल्याचे अधिकार्यांनी सांगितले. या कारवाईदरम्यान अमरावती विभागीय कृषी सहसंचालक अशोक लोखंडे, जिल्हा कृषी अधिकारी प्रमोद लहाने, उपविभागीय कृषी अधिकारी अशोक गायकवाड यांनी भेट दिली. वृत्त लिहिस्तोवर पोलिसात फिर्याद दाखल करण्यात आली नव्हती.