‘शाहू’ची एकरकमी २५३० उचल---राज्यात पहिली उचल

By Admin | Updated: November 5, 2014 00:49 IST2014-11-05T00:36:34+5:302014-11-05T00:49:40+5:30

गळीत हंगाम सुरू : विक्रमसिंह घाटगे यांची पहिल्या उचलीची घोषणा -

The 2530 pick of 'Shahu' - the first pick in the state | ‘शाहू’ची एकरकमी २५३० उचल---राज्यात पहिली उचल

‘शाहू’ची एकरकमी २५३० उचल---राज्यात पहिली उचल

कागल : येथील छत्रपती शाहू सहकारी साखर कारखाना यंदाच्या हंगामातील उसासाठी ‘एफआरपी’एवढी एकरकमी २५३० रुपये पहिली उचल देणार असल्याची घोषणा कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष विक्रमसिंह घाटगे यांनी आज, मंगळवारी येथे केली.
कारखान्याच्या ३५व्या गळीत हंगामाचा प्रारंभ गव्हाणीत ऊस मोळी टाकून त्यांच्याहस्ते करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. कारखान्याचे उपाध्यक्ष एस. के. मगदूम, समरजितसिंह घाटगे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष शशिकांत खोत, कागल बँकेचे अध्यक्ष राजेंद्र जाधव, उपनगराध्यक्षा उषा सोनुले, पंकज पाटील आदी मान्यवर प्रमुख उपस्थित होते.
विक्रमसिंह घाटगे म्हणाले, ‘राज्य बँकेने या गळीत हंगामासाठी प्रतिक्विंटल २६३० रुपये इतके साखर मूल्यांकन केले आहे. १५ टक्के मार्जिन रक्कम, ऊस अ‍ॅडव्हान्स १४८५, प्रक्रिया खर्च २५० रुपये, कर्जवसुलीसाठी ५०० रुपये अशी विभागणी आहे. ‘शाहू’वर कर्जाचा बोजा नसल्याने त्यातील ४२५ रुपये मिळतील. त्यामुळे ही रक्कम १९१० पर्यंत जाते तरीही एफआरपीची रक्कम देण्यासाठी ६२० रुपये कुठून उपलब्ध करायचे, हा प्रश्न आहे, अशी अडचण सर्वच साखर कारखान्यांसमोर आहे. शाहू साखर कारखान्याने चांगले आर्थिक नियोजन केल्याने ‘एफआरपी’ची रक्कम देण्यास अडचण नाही. राजर्षी शाहू महाराजांच्या आशीर्वादाने कारखान्याने अनेक क्षेत्रांत उत्तम कामगिरी केली आहे. त्यामुळेच सभासदांचाही विश्वास वृद्धिंगत होत आहे.‘शाहू’चे तेच महत्त्वाचे बळ आहे.’
समरजितसिंह घाटगे म्हणाले, शेतकऱ्यांनी केवळ पहिल्या हप्त्याची रक्कम न बघता अंतिम दराचाही हिशेब करावा. काहीतरी करून ऊस घालविण्याच्या नादात शेतकऱ्यांना ऊस दरात चार-पाचशे रुपयांचा फटका बसतो. कारखान्याचे गाळप उद्दिष्ट पूर्ण होण्यासाठी सभासद शेतकऱ्यांनी सर्व ऊस कारखान्याला घालून सहकार्य करावे. कारण चांगले गाळप तरच चांगला दर असे त्याचे सूत्र आहे. प्रास्ताविक व्यवस्थापकीय संचालक विजय औताडे यांनी केले. ते म्हणाले यंदा कारखान्याचे आठ लाख टन ऊस गळिताचे उद्दिष्ट आहेच त्याचबरोबर एक कोटी लिटर स्पिरीट व चार कोटी ४० लाख युनिट वीज विक्रीचे उद्दिष्ट आहे. शाहू नुसता साखर उत्पादनातच नव्हे तर अन्य पूरक उद्योगांतही पुढे राहील, असाच आमचा प्रयत्न आहे. उपाध्यक्ष एस. के. मगदूम यांनी स्वागत केले. संचालक अमरसिंह घोरपडे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)

राज्यात पहिली उचल
पहिल्या उचलीचा तिढा अजून सुटला नसल्याने पश्चिम महाराष्ट्रातील कारखान्यांची धुराडी अजून पेटली नसली तरी राज्यभरात २२ कारखाने सुरू झाले आहेत. परंतु, आर्थिक विवंचना असल्याने कोणत्याच कारखान्याने अजून पहिली उचल जाहीर केलेली नाही. शाहू साखर हा उचल जाहीर करणारा पहिला कारखाना ठरला आहे.

चर्चेस तयार...
ऊस दराबद्दल केंद्र व राज्य शासन, शेतकरी संघटनांनी चर्चा करून तोडगा काढावा व त्यानुसार आमचा कारखाना निर्णय घेईल. या चर्चेसाठी आम्हाला कुणी बोलावले तर शेतकऱ्यांच्या व्यापक हिताचा विचार करून आम्हीही त्या चर्चेत सहभागी होण्यास तयार आहोत, असे विक्रमसिंह घाटगे यांनी स्पष्ट केले.

Web Title: The 2530 pick of 'Shahu' - the first pick in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.