२२ आत्मसमर्पित नक्षलवाद्यांची हत्या
By Admin | Updated: September 8, 2015 00:55 IST2015-09-08T00:55:52+5:302015-09-08T00:55:52+5:30
दरवर्षी आत्मसमर्पित नक्षलवाद्यांची त्यांच्याच जुन्या सहकाऱ्यांकडून हत्या होत असल्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. त्यामुळे या नक्षलवाद्यांच्या जीवनसुरक्षेचा प्रश्न सोडविण्यात

२२ आत्मसमर्पित नक्षलवाद्यांची हत्या
गडचिरोली : दरवर्षी आत्मसमर्पित नक्षलवाद्यांची त्यांच्याच जुन्या सहकाऱ्यांकडून हत्या होत असल्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. त्यामुळे या नक्षलवाद्यांच्या जीवनसुरक्षेचा प्रश्न सोडविण्यात अद्यापही राज्य शासनाला यश आल्याचे दिसत नाही. १९८५ ते २०१५ या ३० वर्षांच्या कालावधीत २२ आत्मसमर्पित नक्षलवाद्यांची गडचिरोली जिल्ह्यात माओवाद्यांकडून हत्या झाली आहे.
जिल्ह्यात १९८०च्या दशकात नक्षल चळवळीला सिरोंचा तालुक्यातून प्रारंभ झाला. परंतु २००५नंतर नक्षल आत्मसमर्पण योजनेला शासनस्तरावरून वेग देण्यात आला. आत्मसमर्पण करणाऱ्या नक्षलवाद्यांची संख्याही बऱ्यापैकी वाढू लागली. आतापर्यंत ४७९ नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले असून, १ हजार २६५ नक्षलवादी व त्यांच्या समर्थकांना पोलिसांनी अटक केली आहे.
मागील सहा वर्षांत नऊ आत्मसमर्पित नक्षलवाद्यांची त्यांच्याच जुन्या सहकाऱ्यांनी हत्या केली. २०१०मध्ये ३ आत्मसमर्पितांची हत्या करण्यात आली. २०११मध्ये २, २०१४मध्ये १ व २०१५मध्ये २ आत्मसमर्पित नक्षलवाद्यांची त्यांच्याच जुन्या सहकाऱ्यांनी हत्या केली आहे. जे नक्षलवादी आत्मसमर्पण योजनेचा लाभ घेतल्यानंतर आपल्या जुन्या गावाकडे राहण्यासाठी जातात, ते लोक नक्षलवाद्यांचे लक्ष्य बनतात. त्यामुळे आत्मसमर्पण केलेले बरेच नक्षलवादी आपल्या परिवारासह जिल्हा व तालुका मुख्यालयात राहू लागले आहेत. तरीही त्यांच्या जीविताचा धोका सातत्याने वाढत आहेत. (प्रतिनिधी)