दुष्काळग्रस्त शेतक-यांसाठी २ हजार कोटी रुपयांची आर्थिक मदत
By Admin | Updated: January 13, 2015 16:20 IST2015-01-13T16:20:10+5:302015-01-13T16:20:10+5:30
राज्यातील दुष्काळग्रस्त शेतक-यांना आर्थिक मदत देण्यासाठी राज्य सरकारने २ हजार कोटी रुपयांची आर्थिक मदत जाहिर केली.

दुष्काळग्रस्त शेतक-यांसाठी २ हजार कोटी रुपयांची आर्थिक मदत
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १३ - राज्यातील दुष्काळग्रस्त शेतक-यांना आर्थिक मदत देण्यासाठी राज्य सरकारने २ हजार कोटी रुपयांची आर्थिक मदत जाहिर केली. राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.पीक नुकसानीचा सामना करावा लागलेल्या शेतकऱ्यांना २६ जानेवारीपर्यंत मदतीचे वाटप करण्यात येणार असून मदतीची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे. राज्यातील शेतक-यांसाठी देण्यात येणारी रक्कम पुढीलप्रमाणे आहे. नाशिक विभागाला ३८६.६२ कोटी, पुणे विभागाला ७.५० कोटी, औरंगाबाद विभागाला ८४५.५५ कोटी, अमरावती विभागाला ५००.९३ कोटी रुपये, नागपूर विभागाला २५९.४० कोटी रुपये देण्यात आले आहेत. विभागीय आयुक्ताकडून जिल्हाधिकाऱ्यांमार्फत तहसिलदारांना हा निधी वितरीत झाला आहे. २६ जानेवारीपर्यंत तो शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. बँक खाते नसलेल्या शेतकऱ्यांचे पंतप्रधान जनधन योजनेखाली खाते उघडून मदतीची रक्कम जमा करण्यात येईल. खात्यामध्ये मदतीची रक्कम जमा झाल्यानंतर त्यांना गरजेनुसार रक्कम काढता यावी, यासाठी सर्व बँकांना त्यांच्या शाखांमध्ये पुरेशी रोख रक्कम उपलब्ध करण्यात येणार आहे.