1993 मुंबई बॉम्बस्फोट प्रकरण - 16 जूनला अंतिम निकाल
By Admin | Updated: May 29, 2017 17:37 IST2017-05-29T17:37:04+5:302017-05-29T17:37:04+5:30
1993 रोजी मुंबईत झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी अबु सालेमसहित सात जणांविरोधात 16 जून रोजी निकाल सुनावण्यात येणार आहे.

1993 मुंबई बॉम्बस्फोट प्रकरण - 16 जूनला अंतिम निकाल
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 29 - 1993 रोजी मुंबईत झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी अबु सालेमसहित सात जणांविरोधात 16 जून रोजी निकाल सुनावण्यात येणार आहे. या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील सात आरोपींना काय शिक्षा होणार याकडे सर्व देशाचं लक्ष लागलं होतं, मात्र मुंबईतल्या विशेष टाडा कोर्टाने निकाल पुढे ढकलला आहे.
12 मार्च 1993 रोजी13 ठाकाणी झालेल्या शक्तिशाली साखळी बॉम्बस्फोटात 257 जण ठार तर 713 जण जखमी झाले होते. या बॉम्बस्फोटाला 24 वर्ष उलटून गेली आहेत. साखळी बॉम्बस्फोट घडवूण्यासाठी 3 हजार किलो आरडीएक्स पाकिस्तानातून आणले गेले होते. त्यापैकी फक्त 10 टक्के आरडीएक्सचा वापर केला गेला. यामध्ये एकूण 27 कोटी रुपयांच्या मालमत्तेचं नुकसान झालं होतं. या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपीमध्ये अंडरवर्ल्ड डॉन अबू सालेम, मुस्तफा डोसा, फिरोज खान, ताहिर मर्चंट, रियाज सिद्दीकी, करीमुल्लाह शेख आणि अब्दुल कयूम यांचा समावेश आहे. या सर्वांवर आरोप निश्चित केले असून ते दोषी आहेत की नाही, याचा निकाल विशेष टाडा न्यायालयाने पुढे ढकलला आहे. (मुंबई बॉम्बस्फोटातील गुन्हेगाराचा मृत्यू)
साखळी बॉम्बस्फोटात एकूण 129 आरोपी असून 100 आरोपींना टाडा न्यायालयाने दोषी ठरवून 6 महिने ते मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा त्यांच्यावरील आरोपांनुसार सुनावली आहे. या बॉम्बस्फोटांचा मुख्य सूत्रधार म्हणून याकूब मेमनला फाशीची शिक्षा सुनावली होती. त्यानुसार त्याला फाशी देखील देण्यात आली. तर दाऊद इब्राहिम, टायगर मेमन, अनीस इब्राहीम यांसह एकूण 27 आरोपी अजूनही फरार आहेत.