१९ शासकीय आश्रमशाळांचा गुंडाळला गाशा
By Admin | Updated: September 4, 2014 00:52 IST2014-09-04T00:52:09+5:302014-09-04T00:52:09+5:30
आदिवासी विकास विभागाच्यावतीने चालविण्यात येणाऱ्या आश्रमशाळांपैकी सुमारे १४ आश्रमशाळा पूर्णपणे बंद करण्यात आल्या आहेत. तर नागपूर प्रकल्पातील ५ आश्रमशाळांचे १ ते ४ पर्यंतचे वर्ग बंद करण्यात आले आहेत.

१९ शासकीय आश्रमशाळांचा गुंडाळला गाशा
कर्मचाऱ्यांचे समायोजन : १४ पूर्णपणे बंद तर ५ आश्रमशाळांचे १ ते ४ पर्यंतचे वर्ग बंद
दिगांबर जवादे - गडचिरोली
आदिवासी विकास विभागाच्यावतीने चालविण्यात येणाऱ्या आश्रमशाळांपैकी सुमारे १४ आश्रमशाळा पूर्णपणे बंद करण्यात आल्या आहेत. तर नागपूर प्रकल्पातील ५ आश्रमशाळांचे १ ते ४ पर्यंतचे वर्ग बंद करण्यात आले आहेत. यातील जवळपास ९० कर्मचाऱ्यांचे समायोजन करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पटसंख्येअभावी पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात शाळा बंद करण्यात आल्याने कर्मचाऱ्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.
आदिवासी विकास विभागाच्यावतीने राज्यात ५४७ शासकीय आश्रमशाळा व ५५६ अनुदानित आश्रमशाळा चालविल्या जातात. या आश्रमशाळांंमध्ये सध्यास्थितीत ३ लाख ९८ हजार ९० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. आश्रमशाळांमध्ये विद्यार्थ्याच्या शिक्षणाबरोबरच राहण्याची व भोजनाचीही व्यवस्था केली जाते. त्यामुळे या आश्रमशाळांमध्ये प्रवेश घेण्यासाठी एके काळी विद्यार्थ्यांच्या उड्या पडत होत्या. मात्र कालांतराने या आश्रमशाळांच्या देखभालीकडे आदिवासी विकास विभागाचे व शासनाचे दुर्लक्ष झाले. अनेक आश्रमशाळा जीर्ण इमारतीमध्येच भरविल्या जातात. पावसाळ्याच्या दिवसात छत गळत असल्याने विद्यार्थ्यांना अख्खी रात्र जागून काढावी लागते. आजपर्यंत शेकडो विद्यार्थ्यांचा सर्प व कीटकांच्या दंशाने मृत्यू झाला आहे. प्रत्येक गावात जिल्हा परिषदेची शाळा सुरू झाली आहे. शासनाने प्रत्येक विद्यार्थ्यासाठी मध्यान्ह भोजन योजना सुरू केली आहे. त्यामुळे कोसोदूर असलेल्या आश्रमशाळेमध्ये आपल्या मुलाला पाठविण्यास पालकवर्ग तयार होत नाही. परिणामी आश्रमशाळांना विद्यार्थी मिळणे कठीण झाले आहे. बराचशा आश्रमशाळांमध्ये एका वर्गात ४ ते ५ विद्यार्थ्यांनी चालू शैक्षणिक सत्रात प्रवेश घेतला आहे. एवढ्या विद्यार्थ्यांसाठी लाखो रूपयांचा खर्च शासनाला करणे परवडत नसल्याने नागपूर विभागातील सुमारे १९ शासकीय आश्रमशाळा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये अहेरी, देवरी, चिमुर, चंद्रपूर, गडचिरोली या प्रकल्पांमधील १४ आश्रमशाळांचे सर्वच वर्ग बंद करण्यात आले आहेत. तर नागपूर प्रकल्पातील ५ शाळांचे १ ते ४ पर्यंतचे वर्ग बंद करण्यात आले आहेत. या आश्रमशाळांमधील मुख्याध्यापक, माध्यमिक शिक्षक, प्राथमिक शिक्षक, अधीक्षक, अधीक्षिका आदी जवळपास ९० कर्मचाऱ्यांचे समायोजन करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ऐन पावसाळ्याच्या दिवसांत शासनाने हा निर्णय घेतल्याने विद्यार्थी व कर्मचाऱ्यांची फार मोठी ससेहोलपट झाली आहे. एवढ्या शाळा बंद पडण्याची ही पहिलीच वेळ आहे. भविष्यातही आश्रमशाळांना विद्यार्थी मिळणे कठीण होणार असल्याने कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर टांगती तलवार असल्याचे दिसून येत आहे.