‘गोल्डन अवर’चे १,८०० कर्मचारी पगाराविना !
By Admin | Updated: February 26, 2015 02:52 IST2015-02-26T02:52:13+5:302015-02-26T02:52:13+5:30
अपघात झाला, आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यावर त्यात जखमी झालेल्यांना ‘गोल्डन अवर’ (एक तासाच्या आत) उपचार मिळाल्यास

‘गोल्डन अवर’चे १,८०० कर्मचारी पगाराविना !
मुंबई : अपघात झाला, आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यावर त्यात जखमी झालेल्यांना ‘गोल्डन अवर’ (एक तासाच्या आत) उपचार मिळाल्यास त्यांच्या जिवाचा धोका टाळता येऊ शकतो. जखमींना उपचार मिळण्यासाठी वेळेत रुग्णवाहिका त्या ठिकाणी पोचण्याची गरज असते. यासाठीच महाराष्ट्र राज्य सरकारने १०८ हा टोल फ्री क्रमांक रुग्णवाहिकेसाठी दिला आहे. पण या रुग्णवाहिकांच्या १,८०० कर्मचाऱ्यांना जानेवारी महिन्याचा पगार न मिळाल्याने त्यांनी मंगळवार, २५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ ते ८ या वेळेत काम बंद आंदोलनाचे हत्यार उपसले होते. पण पगार मिळण्याचे आश्वासन मिळाल्यावर हे आंदोलन स्थगित करण्यात आले.
१ मार्च २०१४ रोजी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते १०८ हा क्रमांक रुग्णवाहिकेसाठी सुरू करण्यात आला होता. १०८ हा क्रमांक डायल केल्यावर अवघ्या पाच ते पंधरा मिनिटांमध्ये रुग्णवाहिका त्या स्थळी पोहोचते. या रुग्णवाहिका सुसज्ज असतात. दिवस-रात्र ही सेवा सर्वांसाठी खुली आहे. सध्या महाराष्ट्रात एकूण ९०० रुग्णवाहिका कार्यरत आहेत. या रुग्णवाहिकांच्या चालकाला १२ तासांची पाळी असून, यांना महिना १२ हजार रुपये पगार देण्यात येतो. दर महिन्याच्या १० ते १५ तारखेपर्यंत कामगारांना पगार होतो. सध्या राज्यात ९०० रुग्णवाहिकांवर १ हजार ८०० चालक कार्यरत आहेत. ही सेवा दिवस-रात्र असल्याने
१२ तास एका चालकाला काम करावे लागते. फेब्रुवारी महिन्याची २४ तारीख आली, तरी जानेवारी महिन्याचा पगार कामगारांना मिळाला नव्हता. यामुळे संतप्त झालेल्या कामगारांनी मंगळवारी सायंकाळी १ तास आंदोलन केले होते. बुधवारी पगार मिळण्याचे आश्वासन दिले होते. यामुळे आम्ही आंदोलनाला स्थगिती दिल्याचे कामगारांच्या संघटनेतर्फे सांगण्यात आले. (प्रतिनिधी)