१८ हजार हजयात्रेकरू मतदानाला मुकणार

By Admin | Updated: September 15, 2014 04:28 IST2014-09-15T04:28:40+5:302014-09-15T04:28:40+5:30

सण,उत्सवाला बाधा येणार नाही, अशी खबरदारी निवडणुका जाहीर करताना निवडणूक आयोगाने घेतली असली तरी राज्यातील सुमारे १८ हजार मुस्लीम भाविक मात्र याच काळात यंदाच्या हज यात्रेसाठी सौदी अरेबियाला रवाना

18 thousand thousand electorate will lose the ballot | १८ हजार हजयात्रेकरू मतदानाला मुकणार

१८ हजार हजयात्रेकरू मतदानाला मुकणार

जमीर काझी, मुंबई
सण, उत्सवाला बाधा येणार नाही, अशी खबरदारी निवडणुका जाहीर करताना निवडणूक आयोगाने घेतली असली तरी राज्यातील सुमारे १८ हजार मुस्लीम भाविक मात्र याच काळात यंदाच्या हज यात्रेसाठी सौदी अरेबियाला रवाना होत आहेत. ते २० आॅक्टोबरनंतर मायदेशी परतणार असल्याने हे नागरिक मतदानाचा हक्क बजावण्यापासून वंचित राहतील.
सौदी अरेबियामध्ये ४ आॅक्टोबरपासून हजच्या प्रमुख विधीला प्रारंभ होत आहे. त्यासाठी देशभरातील १ लाख ३६ हजार मुस्लीम सहभागी होणार असून, महाराष्ट्रातील १८ हजार यात्रेकरूंचा त्यात समावेश आहे. त्यापैकी ८ हजार १८१ हज कमिटी आॅफ इंडियाच्या माध्यमातून तर उर्वरित खासगी टूर कंपनीद्वारे यात्रेत सहभागी होत आहेत. खासगी कंपन्यांसाठी एकूण ३४ हजारांचा कोटा आहे. हे १८ हजार भाविक राज्यभरातील आहेत. एकाही ठिकाणी त्यांची संख्या निर्णायक नसली तरी मुस्लिमांना हक्काची व्होट बँक समजल्या जाणाऱ्या काँग्रेस आघाडी तसेच धर्मनिरपेक्ष पक्षाच्या उमेदवारांना त्याचा निश्चितच फटका
बसणार आहे. ते भारतात परतेपर्यंत निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन नवीन सरकार कोणाचे हेही स्पष्ट झालेले असेल.
इस्लाम धर्मातील प्रमुख पाच तत्त्वांपैकी हज यात्रा हे एक तत्त्व आहे. सौदी अरेबियात होणाऱ्या या यात्रेसाठी हज कमिटीमार्फत महाराष्ट्रातून औरंगाबाद, नागपूर व मुंबई येथील विमानतळांवरून रवाना होतात. त्यासाठी एकूण २९ विमानांची नोंदणी केलेली असून, ७ सप्टेंबरला औरंगाबादमधून यात्रेकरूंची पहिली तुकडी रवाना झाली. मुंबईतून हज कमिटीमार्फत ११ फ्लाईटमधून एकूण ४ हजार ५७५ भाविक रवाना होणार आहेत. १४ सप्टेंबरपासून टप्प्याटप्प्याने भाविकांना पाठवण्यात येत आहे.
हजचा विधी पूर्ण झाल्यानंतर पहिली तुकडी १९ आॅक्टोबरला परत येईल. त्यानंतर ६ नोव्हेंबरपर्यंत भाविकांचे मायदेशी आगमन होणार असल्याचे हज कमिटी आॅफ इंडियाचे उपमुख्याधिकारी एम.ए. पठाण यांनी सांगितले.

Web Title: 18 thousand thousand electorate will lose the ballot