विसर्जनात १८ गणेशभक्तांचा मृत्यू
By Admin | Updated: September 29, 2015 02:56 IST2015-09-29T02:56:57+5:302015-09-29T02:56:57+5:30
राज्यात गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान झालेल्या दुर्घटनेत १८ जणांचा दुर्दैवी अंत झाला. त्यात मराठवाड्यात ६, नाशिक व नगरमध्ये प्रत्येकी ३, पुणे व गडचिरोलीतील

विसर्जनात १८ गणेशभक्तांचा मृत्यू
मुंबई : राज्यात गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान झालेल्या दुर्घटनेत १८ जणांचा दुर्दैवी अंत झाला. त्यात मराठवाड्यात ६, नाशिक व नगरमध्ये प्रत्येकी ३, पुणे व गडचिरोलीतील प्रत्येकी एक व साताऱ्यात दोन अशा १६ गणेशभक्तांचा बुडून मृत्यू झाला. तर खान्देशात मिरवणुकीत नाचताना हृदयविकाराच्या झटक्याने दोघांना जीव गमवावा लागला.
प्रतिक हौसेराव गायकवाड (१३) व सुजित भास्कर गाढवे (१४ दोघे रा़ कुसूमनगर, जि. उस्मानाबाद), आशिष बजरंग कोल्हापूरे, ज्योतिबा सखा कोल्हापूरे (१२, दोघे रा. शेपवाडी, जि. बीड) आणि विद्याधर मेघवाल (२५, रा. जालना), अनिल भगवान पाटील (१८, रा. ढवळेश्वर, जालना) यांना विसर्जनादरम्यान जीव गमावावा लागला.
गडचिरोलीतील कुरखेडा येथे कामेश चंद्रभान चव्हाण (१७), नाशिकमध्ये संजय नारायण तारु (१६), कृष्णा भिकारीलाल दुर्वे (२३), मयूर संपत वाघ (१६), नगरमध्ये श्रावण भानुदास शिंदे (५७, रा. टाकळी लोणार), प्रशांत श्रीमंत कोकाटे (२२, संगमनेर), पोपट लक्ष्मण गोलवड (५०, रा. शिरसगाव) तसेच सातारा जिल्ह्यात सैदापूर-कऱ्हाड येथे रोहित केंगार (२१) व वर्धनगड येथे अजय विजय पोपळघट (२३, रा. किल्ले धारूर, जि. बीड) यांचा विसर्जनादरम्यान जलाशयात बुडून मृत्यू झाला.
रविवारी सायंकाळी गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान वाटप करण्यात आलेल्या सरबतातून ३८ जणांना विषबाधा झाल्याची घटना जोगेश्वरी पूर्वच्या इंदिरा नगरमध्ये घडली. विषबाधा झालेल्या रुग्णांना रात्री साडेदहापासून हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले. २० जणांवर रुग्णालयात उपचार सुरु असून सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली. गणेश विसर्जन मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या भक्तांसाठी जोगेश्वरीच्या साई माऊली वारकरी सेवा समितीतर्फे मेघवाडीतील इंदिरानगर परिसरात सरबत वाटप करण्यात येत होते. ओमकार साई सेवा समितीतील कार्यकर्त्यांनी येथील सरबत प्यायले. थोड्याच वेळात त्यांना उलट्या होऊ लागल्या. एकूण ३८ जणांना विषबाधेचा त्रास झाला. १८ जणांवर प्राथमिक उपचार करुन त्यांना घरी सोडण्यात आले, तर २० जणांवर उपचार सुरु आहेत. यामध्ये ७ मुले, ८ महिला आणि ५ पुरुषांचा समावेश असल्याची माहिती ट्रॉमा केअरचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. शशिकांत वाडेकर यांनी दिली.
या घटनेतील सरबताचे नमुने तपासणीसाठी कलिनाच्या फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्यात आले आहेत. अहवाल आल्यावरच कोणत्या घटकामुळे विषबाधा झाली, हे स्पष्ट होईल असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान सरबतातून विषबाधा झाल्याप्रकरणी चौकशी करण्यात यावी, अशा सूचना जोगेश्वरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रवींद्र वायकर यांनी दिले आहेत. वायकर यांनी विषबाधा झालेल्या रुग्णांची सकाळी भेट घेतली. (लोकमत न्यूज नेटवर्क)
-----------
साताऱ्यात डॉल्बीमुक्त विसर्जन मिरवणूक !
सातारा : लोकहिताबरोबरच लोकभावनेलाही जपण्याचा ‘लोकमत’चा प्रबोधनमार्ग पुन्हा एकदा यशस्वी झाला. ‘डॉल्बीमुक्ती’चा मार्ग मंगलमूर्तींच्या साक्षीने सातारा जिल्ह्यात प्रशस्त झाला आहे. ही लोकचळवळ गावागावात, घरोघरी पोहोचण्यासाठी सर्वांचेच सहकार्य ‘लोकमत’ला लाभले. जिल्ह्यातील दीड हजारांहून अधिक गावांपैकी केवळ हाताच्या बोटांवर मोजण्याइतक्या गावांतच डॉल्बी वाजली; तीही एकाच स्पीकरचा वापर करून!
गेल्या वर्षी डॉल्बीच्या दणदणाटामुळे भिंत कोसळून साताऱ्यात तीन जणांना प्राण गमवावे लागले होते. कर्णकर्कश डॉल्बीमुळे होणारे दुष्परिणाम निदर्शनास आणून देतानाच पारंपरिक मिरवणुकीचा थाट अधोरेखित करुन ‘लोकमत’ने यावर्षी वाचकांना साद घातली. भुर्इंज गावाने डॉल्बीमुक्तीचा श्रीगणेशा ठरावाद्वारे केला आणि सर्व गावे खडबडून जागी झाली. ‘आपल्याही गावात असा क्रांतिकारी निर्णय घ्यायचा,’ असे ठरवून बैठका झाल्या.
पोलीस प्रशासनानेही ‘लोकमत’च्या चळवळीला सक्रिय पाठबळ देत गावागावात बैठका घेऊन आवाहन केले होते. (प्रतिनिधी)